Monday 29 December 2014
"स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे काय? "
अगदी रोजचेच पाहा ना, तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलाला सांभाळून, वाढवून, पुढे मोठ्या हौसेनं त्याचं लग्न लावून सून घरी आणते. पण नव्याची नवलाई सरली की साध्या साध्या कारणांवरून मतभेदाला सुरुवात होते. आईला स्वतःच्या मुलाच्या प्रेमात वाटेकरू नको असतो, तर सुनेला नवऱ्याच्या प्रेमात वाटेकरू नको असतो, किंबहुना दोघींनाही कोणत्याच क्षेत्रात आपला वाटेकरू नको असतो. सासूला वाटतं की इतकी वर्षे या घरासाठी, कुटुंबासाठी झिजले, झटले; हे घर नावारूपाला आणलं. त्यामुळं या घरावर माझीच सत्ता/हुकुमत हवी. सुनेचा शहाणपणा तिथं नकोय. अन् इकडे सुनेला वाटतं की माझं सारं सोडून नवऱ्यासाठी या घरात आले तेव्हा हे सारं माझ्याचं हक्काचं आहे. आता इथं माझ्या तंत्रानंच सारं घडायला हवं. तिथं मधेमधे सासूबाईंची लुडबूड कशाला? इतके दिवस त्याच होत्या ना? अशा प्रकारे दोघीही स्वतःचं अस्तित्व जपण्यात घराचं घरपण हरवून बसतात व एकमेकांपासून दुरावतात.तसेच लग्नापूर्वी आपुलकीने व एकमेकींच्या ओढीने राहत असलेले भाऊ लग्नानंतर एकमेकांपासून दूर जातात. याला जबाबदार स्त्रियाच असल्याचं बहुतांशी आढळून आलेलं आहे. म्हणजे सासू-सुनांतील कलहामुळे पुत्रप्रेम दुरावते तर जावांच्या स्वार्थी-अहंकारी वृत्तीमुळे भाऊ भाऊ दुरावतात. हे कौटुंबिक जीवनात घडतंय, तर सामाजिक पातळीवर सुद्धा आपण पाहतो की, एखाद्या लाचार, असहाय्य मुलीला फसवून तिला कुमार्गाला लावून किंवा तिची विक्री करून स्वतःची खळगी भरणारी स्त्री ही स्वार्थीच म्हणावी लागेल. बरं अशा पतीत स्त्रियांचा उद्धार करायचं म्हटलं तरी किती स्त्रियांचा प्रतिसाद मिळेल? नगण्या! अगदी माझ्या सहित...हे शत्रुत्व फक्त वर्तमान काळातच आहे असं नाही, तर रामायणात, पेशवाईत, शिवकालीन युगात जरी डोकावलं तरी चित्र काय फारसं निराळं असेल असं नाही. फक्त स्वरूप वेगळं होतं एवढंच. स्वराज्याच्या संस्थापकाला घडविणाऱ्या जिजाऊंची मतप्रणाली महाराणी सोयराबाईंना जाचक वाटून त्यांच्यात मत-भिन्नता असल्याचे दाखले इतिहासात आढळतात. पेशव्यांच्या घराण्यांतील 'ध' चा 'मा' करणारी आनंदीबाई! केवळ ते पोर जावेचं होतं म्हणून हे वैर. रामराज्यात कौशल्येचा पुत्र राम, म्हणजे सवतीचा मुलगा गादीवर नको असे कैकेयीला सुचविणारी मंथरा, एका स्त्री बद्दल दुसऱ्या स्त्रीच्या मनात विष पेरते व त्यास्तव कैकेयी रामाला १४ वर्षे वनवासात पाठविते. इथली गंमत तरी पहा, की मंथरेचा स्त्रीद्वेष तर कैकेयीचा सवती-मत्सर! म्हणजे कोणत्याही दृष्टिकोनातून किंवा नात्यातून पाहता सगळीकडे शत्रुत्वाची भावनाच प्रामुख्याने दिसून येते.
थोडक्यात, आज इतका काळ लोटला, स्त्री प्रगत झाली, तिची प्रत्येक क्षेत्रातली घेतलेली गरूडझेपही अत्यंत कौतुकास्पद आहे. तरी तिच्या स्वभाव-गुणांत फारसा फरक झाला असावा असं वाटत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment