......................ओढणी ..................
ट्रेनची चौथी सीट
पकडून प्रवास केल्यावर चेहऱ्यावर 'एक गड' जिंकून 'एक योद्धा'
आल्याच्या
अविर्भावात मी चाळीत प्रवेश केला....
चाळीच्या दाराशी लोकांची
गर्दी दिसली."मी 'चौथ्या सीटची लढाई' जिंकली हि खबर चाळीत पण पोहोचली कि
काय?".
हे लोक माझी आता आरती ओवाळणार..."यावे यावे राजे....आप आई बहार
आई....."
पण मी चाळीत प्रवेश केला तरीही कुणी ढुंकूनही पाहिले नाही
माझ्याकडे....मग मात्र मला थोडा संशयच आला....
आम्हा चाळीतल्या लोकांना जरा
सवयच असते गर्दी करायची.
'स्वत:च्या घरात काय चालू आहे' या ज्ञानाबरोबर 'इतर
शेजारांच्या घरात काय चालू आहे' हे माहित असणं आमच्यासाठी
अतिमहत्त्वाचं
असतं...जसे ते तसा मी...मग मी हि मागच्या एकाला हळूच कानात विचारले,
"काय झालं
रे मंग्या? अन्याच्या घरात काही झालंय काय? कुणी गचकला कि काय?"...मी अशीच मस्करी
केली.
"गचकला नाही....गचकावला...अन्याने स्वत:च्या बायकोला गळा घोटून
मारले"...
ऐकल्याच क्षणी माझा हात माझ्याच गळ्याशी गेला....थोडा भूकंप
झाल्यासारखे वाटले...योद्धा थोडा हडबडला होता....
अनिकेत अशी काही हरकत करेल हे
माझ्याच काय तर इतर कुणाच्या हि बुद्धीला पटणारे नव्हते.
कारण अनिकेत म्हणजे तसा
सुजाण माणूस होता.सगळ्यांत मिळून मिसळून राहणारा.माझा यार....
दिसायलाही
राजबिंडा.नोकरी चांगली होती.स्वत:चे राहते घर होते....आई बाबांचा लाडका नसला तरी
दोडका पण नव्हता.
जशी इतर घरात होतात तशी त्यांच्या हि घरात भांडणं
व्हायची....शेवटी काय...?
दोन पिढ्या एकत्र वावरताना दोनच गोष्टी गरजेच्या
असतात....एकतर 'संवाद' नाहीतर 'शांतता'...
दोन्ही नसेल तेव्हा फक्त युद्धं
होतात....रक्त नाही सांडली तरी भांडी पडतात....त्यांना पोकं
येतात....
अनिकेतची बायको म्हणजे 'काव्या'...काव्या नावासारखीच
होती...कवितेसारखी....रेंगाळणारी....
दिसायला नक्षत्र....वागायला नम्र..... नजर
लागायची १००% शक्यता होती.....आणि लागलीच....
डोळ्यांत खूप स्वप्न घेऊन
अनिकेतसोबत एका वर्षापूर्वीच तिने 'थोरातांची सून' म्हणून घरात प्रवेश केला
होता.
मोठ्या कौतुकाने अनिकेतने बायकोचे नाव 'काव्या' ठेवले होते.तेव्हापासून
'पूजा शिंदे' ची 'काव्या थोरात' झाली होती.
माझी काही जास्त ओळख नव्हती तिच्याशी
पण बोलून चालून ओळख होती.
तिचे प्रेत बाहेर आणले गेले.तिचा चेहरा अजूनही
हसरा होता.
'सुंदर लोक कोणत्याही क्षणी कोणत्याही वेशात सुंदरच दिसतात' याची
खात्री पटली.
मागून अनिकेतला आणले गेले.त्याच्या चेहऱ्यावर भाव विचित्र होते.कळत
नव्हते...
छोटासा का होईना लेखक मी.....पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला शब्दात
पकडता येत नव्हते.
पोलीस आले आणि अनिकेतला घेऊन गेले.....आणि काव्याचा देह
सुद्धा....
गुन्हा अनिकेतने कबूल केल्याने पोस्ट-मार्टम करण्यास जास्त वेळ
लागणार नव्हता....
गर्दीची सर्व कारणं गेल्यावर गर्दी करण्यात अर्थ
नव्हता....बाकी सगळे गेले...
माझी आई अनिकेतच्या आईची समजूत काढत
होती....
"असा नाही आहे हो आमचा अनिकेत.आम्हाला वाटलं दोघांचा संसार सुरळीत चालू
आहे....कुणाची नजर लागली हो..?"
बाहेरून अनिकेतच्या आईचे रडणे आणि
डोळ्यांसमोर काव्याच्या देहाकडे बघणारा अनिकेत....
श्या....जेवण जात
नव्हते...झोप हि उडाली होती....
"का रे अनिकेत असे का केलेस मित्रा?....मित्रा

? तुला मित्र म्हणू की
नको हा विचार करावासा वाटतोय..
इतका नाजूक गळा दाबताना तुला अजिबात कीव नाही आली
का रे?...का?? का केलेस?
श्या....प्रश्न प्रश्न....आणि प्रश्न.....
पण उत्तरं
नाहीत....उत्तरं देणारा कुठेय???....हे करून तो खुश असेल का?..
हे घडल्यावर ती
खुश असेल का? गळा घोटताना तिला किती दुखले असेल...?
पण तरीही तिचा चेहरा हसरा
कसा होता....?....अनिकेत...अन्या....सांग मला....असे का केलेस?"
माणसाला
आयुष्यात काय काय हवे असते?...मान्य आहे कि मागितलेले सगळेच मिळत नाही...
नाही
मिळणारा माणूस रडत राहतो....
पण मिळाले कि असे स्वतःच्या कर्माने घालवून
बसतो....
कधी कधी स्वत:च्या संसाराला स्वतःचीच नजर लागते.....
हा 'आरंभ'
आहे कि 'शेवट' आहे हें सांगणं कठीण होतं...
उद्या जाऊन सकाळी सकाळी अनिकेतला
भेटल्याशिवाय मला राहवणार नव्हते.....
उद्याच सकाळी अग्नी दिल्यावर त्याला
न्यायालयात सादर करणार होते.त्या आधी मला त्याला भेटायचे होते.
पोलीस स्टेशनचा
इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचा होता..आमच्या ऑफिसच्या जोश्याचा चुलत भाऊ....
म्हणून
बोलायला वेळ मिळाला.नाहीतर पाच मिनिटात उरकायला लागणार होते....
मी लॉक-अप
जवळ गेलो.अनिकेत शांत बसला होता.....गुन्हा केलाय असे वाटतच नव्हते....
मला
पाहून तो धावत धावत लॉक-अपच्या दाराशी आला....
लॉक-अपच्या दाराशी येऊन लोखंडी
सळयांमधून अनिकेतने माझा हात धरला....
आणि म्हणाला...."संपवलं...संपवलं मी
सगळं.बघ आता कुणालाच त्रास नाही.
श्री....शांत झालंय बघ सगळं...ती आनंदात आहे बघ
आता."
"अन्या....अन्या...काय बोलतोयस हे...कोण आनंदात असेल?..वेडा झालायस का?काय
करून ठेवलंस हे?..काय बिनसलं होतं रे तुझं?
काव्यासारखी बायको मिळायला नशीब
लागतं रे मित्रा...गमावून बसलास सगळं.."
"गमावलं.

?कोण बोलतं
असं...?मी तिला गमावून....कमाव
लंय...श्री....
'काव्यासारखी बायको मिळायला
नशीब लागतं' खरं बोललास.तो नशीबवान मी...पण आंधळा होतो मी...
नक्षत्र होती माझी
काव्या....हिऱ्यासारखी होती...पण कोंदण चुकलं होतं.इतकं तेज सांभाळायची लायकी
नव्हती रे श्री माझी.
काय काय भोगलं रे तिने माझ्यासाठी?
तिचं हसणं वेड
लावणारं होतं...पण मी तिचं वेड होतो...खूप उशिरा कळले मला ते.
काल हि भांडून
झोपलो मी.जाग आली तेव्हा काव्याही झोपली होती...तिचा ओला गाल पाहिला मी...
रडली
होती ती...खूप खूप रडली होती...रोजच्या सारखीच...मग बसलो आणि विचार
केला....
सगळं सगळं उलघडत होतं....मी दोषी ठरत होतो....
स्वतःच्याच विचारात
स्वतःला दोष आला कि स्वतःच्याच विचारांचा राग येतो...मलाही येत होता स्वतःचा
राग..
मनाच्या जवळचं माणूस जवळ असलं कि गर्दीची भीती वाटत
नाही...पण...
तेच माणूस जवळ नसलं कि स्वत:च्या सावलीचीही भीती वाटते.
मित्र
मला 'बायकोचा बैल' म्हणतील म्हणून कधी गर्दीत कुणासमोर हात नाही धरला मी
तिचा.
नेहमी एकट सोडलं...तिची नजर शोध्याची मला...पण यातच 'पुरुषार्थ' वाटायचा
मला...
पुरुषार्थ....मोठा शब्द आहे ना?अर्थ तरी कळतो का रे आपल्याला
त्याचा?घरातली बायको हवी तशी राबवता आली म्हणजे पुरुषार्थ मिळतो का?
संसार
फुलवायला जे लागते ना त्याला म्हणतात 'पुरुषार्थ'.विस्कटता सगळ्यांना येतं.आवरायला
हिंमत असावी लागते."
अनिकेतच्या डोक्यातली भूतकाळाची पानं पटापट पटापट पलटत
होती...मी प्रयत्न करत होतो.
पण त्यांच्या पलटण्याचा वेग खूप जास्त होता...माझी
घाई होत होती...त्या पानांवरचं सगळं वाचता येत नव्हतं
"श्री...'नांदा सौख्यभरे'
असा आशीर्वाद घेऊन संसार फुलत नसतो रे.साथीदाराचं सौख्य कळायला मनात डोकवावं
लागतं.
पण मला कधीच नाही जमलं ते.'वेळ'...खूप मोठी गोष्ट आहे रे
श्री....नात्यासाठी....
माझ्याकडे वेळ होता....पण तो तिच्यासाठी नव्हता...तो
माझ्या मित्रांसाठी होता...
मित्रांसोबत दारूच्या बाटल्या फोडून Get Together
करताना घरातली सर्वात जवळची मैत्रीण एकटी पडलीय हे विसरलो होतो मी.
आपल्या
निर्णयात आपल्या जोडीदाराची साथ असली कि हुरूप येतो..पण मी नेहमी ग्राह्य धरलं
तिला.
पण तिने तोंडातून 'ब्र' नाही काढला श्री....दुनियेला एक शब्द नाही
कळला.तिने कळूच नाही दिला.
आपण हसलं कि जग फसतं...
तिनेही हेच
केलं..नेहमी हसऱ्या चेहऱ्याने जगाला फसवलं.स्वतःचा त्रास कधी नाही दाखवला
कुणाला?
का राहावं तिनं माझ्यासोबत?लायकी तरी आहे का माझी?...
कोणत्या
विश्वासाने माझ्या हातात तिचा हात दिला होता त्या बापानं?"सांभाळ माझ्या पोरीला"
असे म्हणाले होते ते.काय तोंड दाखवू त्यांना आता?
मी ओळखतो स्वतःला....दोन दिवस
सुधारीन आणि पुन्हा माज चढेल मला...पुन्हा तीच सहन करणार...
घटस्फोट दिला तर
जग मला सोडून तिलाच दोष देईल...एकच उपाय...मरण...
माझं नाही....तिचं...मी
आत्महत्या केली तर जग तिलाच टोचून टोचून मारेल.."
तशीच ओढणी उचलली मी
तिची....
तिचीच ओढणी हातात घेऊन तिच्या गळ्याभोवती गुंडाळली.गच्च खेचत गेलो
ती.
तिच्या ओढणीतून तिचा सुंदर चेहरा चंद्रासारखा दिसत होता.चांदणं पडलं होतं.पण
फक्त माझ्यावरच.
दोन क्षण वाटले कि, इतका निर्दयी कसा होऊ मी?इतकी नाजूक...इतकी
गोड काव्या माझी...
नाही...नाही...नाही जमणार हे मला...
पण श्री.....पण
पुढच्याच क्षणी मला रोज रात्री रडणारी, गालावर सुकेलेलं पाणी घेऊन तशीच
झोपनारी
काव्या दिसली.तिच्या मनातलं ऐकू येत होत मला..ती म्हणत होती,
"फक्त
जेवलं,पाणी पिलं,पोट भरलं इतकीच असते का रे माणसाची भूक?
मनाचं काय?त्याला काय
हवं असतं रे...दोन सोबतीचे क्षण,जिव्हाळ्याची एक हाक,मायेचा एका स्पर्श....
आणि
तितकं द्यायला हि आपल्या माणसांकडे वेळ नसावा.
असण्याला 'असणं' कसं म्हणावं?इथे
शांती मागितली कि एकांत मिळतो...एकांतात आणि अंतात फक्त एकाचाच फरक...
आम्ही
जगासाठी दोन नसून 'एक' आहोत...आम्ही खरंच 'एक' आहोत...पण आमचा 'एक' आणि जगाचा 'एक'
वेगळा आहे.
आम्ही एक-एकटे आहोत."
गळा आवळला ना तसा तिला थोडा त्रास
झाला.पण माझ्या डोळ्यांत पाणी होतं तिच्यासाठी.
प्रेम होतं तिच्यासाठी.तिने ते
पाहिलं माझ्या डोळ्यांत आणि गोड हसली.हसतच राहिली.
माझा हात गच्च होत होता.ओढणी
ताणली जात होती आणि ती सुंदर हसत होती....
तिच्या प्रत्येक हसऱ्या क्षणासोबत
माझा हुंदका वाढत होता....मी आजवर काय काय त्रास दिला,किती छळलं हे आठवत
होतं...
नाही...नाही....या पुढे नाही द्यायचा त्रास....
माणूस आहे रे
ती...सहन तरी किती करावं?...ओढणी ताणली...गळयाजवळचा माझा धरलेला हात तिने घट्ट
केला.
खूप ओढ होती रे त्या स्पर्शात...पण मी म्हणालो तिला,"नको लावूस इतकी
ओढ...मी नाहीयेय या ओढीच्या लायकीचा..तू छान आहेस काव्या.चुकलो मी माफ कर
मला."
गोड हसली रे ती....
पुढच्या क्षणी बोटं तिची सैल पडली.डोळे झाकले
तिने सुखाने.पण चेहऱ्यावर तेच हास्य होतं...तेच वेड लावणारं हास्य.
तिच्या
जिवंतपणी जे पाहून नाही शकलो ते सुख होतं तिथं तिच्या
डोळ्यांत,चेहऱ्यात,स्पर्शात.."
पोलिसांनी जीपमध्ये बसवून आम्हा दोघांना स्मशान
भूमीवर आणलं.काव्याच्या बाबांनीच अग्नी दिला होता..
अनिकेत वेड्यासारखा पुन्हा
पुन्हा धावत धावत जात होता त्या आगीतल्या काव्याजवळ....
आणि अडवत होतो आम्ही
त्याला...तो किंकाळत होता...
"बघ बघ....श्री....मी जळतोय आणि ती
विझतेय....."