Tuesday 3 April 2012

एक होतं गाव

एक होतं गाव. महाराष्ट्र त्याचं नाव. गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले
होते. मराठी भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते. त्याचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे. आल्या- गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, ते सुरेल करायचे.

महाराष्ट्रात होता एक भाग. मुंबई त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले, की इथलेच होऊन राहत होते. "अतिथी देवो भव!' या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. अतिथी जास्त आणि यजमान कमी झाले. मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. मराठी आपली वाटत नव्हती. प्रश्‍न मोठा गहन होता; पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती. त्यांना एक युक्ती सुचली. दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली. त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील. सर्वांचाच, अगदी महाराष्ट्राचाही विकास होईल म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली. आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली. आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली. आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना, बोली भाषाही बदलली. सगळ्यांचा नुसता काला झाला. शुद्ध, सुंदर मराठीचा लोप झाला.

अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर- माफ करा हं- आपल्या मम्मीबरोबर एकदा वाचनालयात गेला. चुकून त्याचा हात एका पुस्तकावर पडला. त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली. त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल. इतक्‍यात त्या मुलानं विचारलं, (त्याच्या भाषेत) ""मम्मी, कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गं हे?'' मम्मी खूप सजग होती, मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती. पुस्तक परत जागेवर ठेवत म्हणाली, ""अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या आजोबांच्या वेळेस मराठी भाषा प्रचलित होती; आता नाही कोणी ती बोलत.''

पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले; पण हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं

No comments:

Post a Comment