Monday 28 November 2016

*नक्कीच वाचा..मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??

*नक्कीच वाचा..मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??
1) आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा..
2) मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा..
3) आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा..
4) मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत.. हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा..
5) मित्र असे का वागला हे त्याला न विचारता.. आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा..
6) आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल.. असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा..
7) मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ.. आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा..
8) भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे.. असे आपण ठरवतो तेव्हा..
9) मित्र श्रीमंत झाल्यावर.. आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा..
10) आपला मित्र आता बदलत चालला आहे.. अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा..
11) मित्र बिझी असेल.. त्यालाही त्याच्या अडचणी असतील.. हे आपण विसरायला लागतो तेव्हा..
12) आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा..
13) आपण जसा विचार करतो.. तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे.. असा दुराग्रह बनतो तेव्हा..
14) आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे.. हे लोकांना सांगायला हवे.. अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा..
15) खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा..
16) कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा..
17) आपले मित्रांशिवाय काही अडत नाही.. हे आपण नकळतमित्राला दर्शवायला लागतो तेव्हा..
18) आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा..
19) मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही.. याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय.. असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा..खरं तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते.. तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात.. असे असेल.. तसे झाले असेल.. असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो.. मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.. पण कुठेतरी गैरसमज, अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते.. चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो.. पण मैत्रीमधील धागे तुटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही..तेव्हा मित्रांनो..!!तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्यालामाफ करा.. आणि तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राची क्षमा मागायला लाजू नका..!*


धन्यवाद ...... 

आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन*

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.
तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी...ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.
थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.
एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.
एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, "बाळ, नाव काय तुझं...?"
मी नाव बोललो
कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?
मी पुन्हा बोललो
त्या हसत हसत बोलल्या "अच्छा . छान आहे नाव"
त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं? नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, "डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?" मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, "नाही ओ आजी". का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, "काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा"
हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.
घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील"
मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.
दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.
संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.
मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, "आजी काय करताय हे ?"
त्या हसल्या आणि बोलल्या...बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.
कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.
त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.
कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.
जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या "आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू... मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो....साहेब होशील मोठा तू "
मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.
पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.
मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.
मी जवळच्या टपरीवर गेलो
आणि विचारलं, "इथल्या आजी कुठे आहेत ?" त्याने मला पाहिलं आणि बोलला, "अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.
मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.
अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!
*आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन*

Tuesday 5 April 2016

गरज नाही


डॉ. रुईकर ह्या प्रिन्सिपॉल होत्या. समोर बसलेल्या काव्याच्या वडिलांना त्या कोर्सची माहिती देत होत्या. काव्याही उत्सुकतेने ऐकत होती. काव्याचे वडील एका स्मॉल स्केल युनिटचे मालक होते. आर्थिक परिस्थिती उत्तम होती.
"काय आहे मॅ'म, ग्रॅज्युएशन नंतर हा कोर्स करण्याचे कारण हे आहे की काव्या बिझी राहावी. प्लस तिला त्यातून काही चांगले शिकता आले, ज्याचा पुढे काही फायदा झाला, यू नो, म्हणजे .... काही प्रोफेशनली करता आले तर.... असे बघतोय आम्ही. हा जमाना मल्टिटास्किंगचा आहे तुम्हाला माहीतच आहे. माणसाला वेगवेगळ्या गोष्टी यायला हव्यात असे मी मानतो. त्यामुळे त्या दृष्टीने काही सुचवलंत तर.... म्हणजे.... ते तिला उपयोगीही पडेल आणि तिचा वेळही.... यु नो.... सत्कारणी लागेल"
"शुअर शुअर! मी अ‍ॅक्च्युअली म्हणूनच हा कोर्स सांगतीय तुम्हाला! ह्यात खरे तर एका विशिष्ट विषयाचे किंवा शाखेचे असे सिलॅबस नाहीये. वेगवेगळे विषय आहेत. पार्ट ऑफ धिस, पार्ट ऑफ दॅट! इन फॅक्ट हा कोर्स केल्यानंतर पर्सनॅलिटीमध्ये फार पॉझिटिव्ह फरक पडतो. कॉन्फिडन्स वाढतो. कारण विशिष्टच शाखेच्या अभ्यासामुळे पर्सनॅलिटीवर एक परिणाम झालेला असतो. आता तुम्ही बघत असाल की कॉमर्सची मुले यूझ्वली कोणत्याही घटनेमधील अर्थकारण आधी बघतात. सायन्सची मुले सहसा असे दिसेल की लॉजिकली विचार करण्याचा प्रयत्न करतात. हे वाईट अजिबात नाही. पण एकाच प्रकारची पर्सनॅलिटी होणे हे थोडेसे लिमिटेशन आहे. वन शूड नो बेसिक हिस्टरी, सायन्स, मॅथ्स, लँग्वेजेस, सॉफ्ट स्किल्स आणि बरेच काही काही! इव्हन ह्याचा उपयोग इन्टरव्हिव्ह देतानाही खूप होतो. मी सांगते ना, आमच्याकडच्या सगळ्या मुली प्लेस होतायत गेली तीन वर्षे सलग! ८०% तर कँपसलाच"
"नाही नाही, एक मिनिट, आय बिलिव्ह तुमच्याकडची प्लेसमेन्ट ही बेसिक ग्रॅज्युएशनवर बेस्ड असते, होय ना?"
"ऑफ कोर्स! ते ग्रॅज्युएशन आहे म्हणूनच आम्ही कंपनीजना इन्व्हाईट करू शकतो. पण त्यानंतर हा कोर्स केलेला असल्याने एन्ट्रीच्या बेसिक लेव्हल्स मुली सहज पार करतात. त्यामुळे प्लेसमेन्ट ही निव्वळ ग्रॅज्युएशन देऊ करणार्‍या कॉलेजेसपेक्षा संख्येने आणि दर्जाने, दोन्हीने चांगली असते. वुई आर डीलिंग विथ द बेस्ट एम्प्लॉयर्स इन द इन्डस्ट्री!"
"दॅट इज फाईन मॅ'म, पण समहाऊ आय अ‍ॅम नॉट कन्व्हिन्स्ड!"
"सी वुई हॅव मेनी अदर कोर्सेस. यू कॅन चूझ एनी वन ऑफ देम. पण हा खास मुलींसाठी डेव्हलप करण्यात आलेला कोर्स आहे."
"खरं सांगू का? मला नीट क्लॅरिटीच आलेली नाहीये"
"ओके. हे सिलॅबस! तुम्ही जर बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की सायन्स, मॅथ्स, लॅन्ग्वेजेस, हिस्टरी आणि पर्सनॅलिटी डेव्हलप्मेन्ट, सॉफ्ट स्किल्स, आर्ट अश्या सर्व फिल्ड्समधील बेसिक्स ह्यात पक्की करून घेण्यात येतात. किंबहुना, मी तर म्हणेन की आयुष्याची निश्चीत दिशा ठरवायला हा दोन वर्षांचा कोर्स सुटसुटीत आणि उपयोगी ठरतो. आपला कल कोणीकडे आहे, ह्यापुढे काय करता येईल हे नीट समजू शकते"
"आय....आय डोन्ट गेट यू! ती ह्यानंतर काही करणार नाही आहे. शी विल बी एन्गेज्ड अ‍ॅन्ड विदिन मन्थ्स शी वूड गेट मॅरिड"
"हो पण लग्नानंतर ती काहीतरी करेलच ना?"
"हां म्हणजे तो तिचा निर्णय असेल! तिचा आणि तिच्या नवर्‍याचा! हा हा! आम्ही काय सांगणार?"
"मिस्टर ओम, आमच्या इथल्या मुलींचे करिअर लग्नानंतरच सुरू होते कारण बहुतांशी मुली त्यांच्या लग्नाच्या वयाच्या असतानाच इथे अ‍ॅडमिशन घेतात. आय अ‍ॅम शुअर, तुमच्याही मुलीला लग्नानंतर काही नुसते बसायचे नसेल"
"नाही नाही, ती काहीतरी नक्कीच करेल, पण ...."
"तेच म्हणतीय मी, ती जे करेल ते काय असायला हवे हे ह्या कोर्समधून समजेल"
"नाही पण आत्ताही तिच्या आवडीनिवडी आहेतच की? डान्स आहे, फ्रेंच लँग्वेज आहे, बॅडमिन्टन आहे"
"हो बरोबर, पण...."
"एक मिनिट मॅ'म, एखाद्या विशिष्ट प्रोफेशनकडे कल असलेली अशी मुलगी सासरी धाडून आम्ही किंवा ती काय मिळवणार आहोत? शेवटी ती आणि तिचा नवरा जे काय ठरवतील तेच महत्त्वाचे असणार ना? आमचा आत्ताचा हेतू केवळ ती बिझी राहावी आणि जमल्यास काहीतरी प्रोफेशनल डिग्री मिळावी इतकाच आहे"
"हो मग ते तर शक्य आहेच की? इतर कोर्सेस जे मी दाखवले ते प्रोफेशनलच आहेत. त्यातही प्लेसमेन्ट आहेच."
"बट दे आर टू डिमान्डिंग"
"म्हणजे?"
"म्हणजे वेळ, पैसा, येणे जाणे, अटेन्डन्स, प्रॅक्टिकल्स, आऊट डोअर प्रोजेक्ट्स वगैरे"
"वेल, प्रत्येक कोर्सचे तुम्हाला काही ना काही फायदे आणि काही तोटे वाटणारच"
"ठीक आहे. आम्ही चर्चा करतो घरी, एक दोन दिवसात सांगतो"
"ओह येस, शुअर, प्लीज टेक यूअर टाईम"
वडिल जायला उठले आणि काव्याने प्रथमच तोंड उघडले. तिने थेट रुईकरांनाच विचारले.
"मॅ'म, कोणत्या प्रकारच्या मुली ह्या कोर्सला येतात सहसा?"
काव्याच्या चेहर्‍यावरील कुतुहल पाहून वडिलांना पुन्हा बसावे लागले. रुईकर मॅडम म्हणाल्या:
"पहिली गोष्ट म्हणजे, हा एखादा सबस्टँडर्ड कोर्स आहे असे समजू नकोस. हा खरे तर अतिशय अवघड कोर्स आहे. ह्यातून पुढे गेलेल्या मुलींमधील फरक आम्हाला ठळकपणे जाणवलेले आहेत. इतकेच काय, ड्युरिंग द कोर्सही त्यांच्या आचार-विचारात फरक पडत जातात. आता हेच बघ, ह्या तिसर्‍या सेममध्ये क्रिटिकल थिंकिंग, इन्डिपेन्डन्ट थिंकिंग, डिसीजन मेकिंग हे असे जे विषय आहेत ते शिकवायला बाहेरून तज्ञ येतात. तिसर्‍या सेमनंतर आमच्या मुलींच्या वागण्यात आम्हाला चक्क खूपच पॉझिटिव्ह फरक जाणवतो:
पुन्हा काव्याचे वडील मध्ये पडले. सौम्य पण ठाम स्वरात ते म्हणाले:
"आय हॅव अ प्रॉब्लेम विथ दॅट इटसेल्फ! मुलींच्या विचारसरणीत पॉझिटिव्ह फरक पडणे हे चांगलेच आहे. पण हे क्रिटिकल थिंकिंग, इन्डिपेन्डन्ट थिंकिंग वगैरे हे नेमके काय प्रकार आहेत? माझ्या मुलीला एका जोडीदाराबरोबर सहजीवन जगायचे आहे. कोणताही निर्णय असा स्वतंत्रपणे, एकटीच्याच मताने घेण्याची परिस्थिती तिच्यावर ओढवणार नाहीये. लग्नाआधीपर्यंत आम्ही दोघे तिच्या सोबतीला आहोत आणि लग्नानंतरही आम्ही दोघे प्लस तिचा नवराही आहे"
"तुम्हाला असे वाटते की तिच्या सोबतीला कोणीतरी कायम असणे बरे हेच चुकीचे आहे मिस्टर ओम! ती स्वतः परीपूर्ण असायला हवी असा ह्या कोर्सचा हेतू आहे"
"हो पण सासरी जाऊन हे असे स्वतंत्र विचारसरणीने वागणे वगैरे आम्हाला...."
"स्वतंत्र विचारसरणी म्हणजे नेहमी मतभेदच असतात असे नाही. पण निदान आपले विचार हे तर्कसुसंगत आणि व्यवहारी असायला हवेत ना? कोणावर कोणत्या वेळी काय परिस्थिती ओढवेल हे थोडीच सांगता येते?"
"अहो ते बरोबर आहे मॅडम पण आता काय बोलू ह्याच्यावर? आम्ही, म्हणजे तिचे आई वडील समर्थ आहोत तिचे सगळे करायला"
"आपण तुमच्य अमुलीला समर्थ करायचे आहे, तुम्ही समर्थ आहात म्हणून मुलीला दोन वर्षे कुठेतरी चिकटवायचे आहे असे नाही ना?"
"ते ठीक आहे हो, पण स्वतंत्र विचारसरणी झाली आणि वैवाहिक आयुष्यात मतभेद व्हायला लागले तर काय?"
"ते तसेही होऊ शकतातच की?"
"हो पण त्याला आणखी एक कारण का निर्माण करायचे?"
"कारण हे कारण निर्माण करतानाच तुमची मुलगी आत्मविश्वासाने काही योग्य आणि लाँग टर्मसाठी उचित असे निर्णय घेऊ शकण्यास समर्थ होते"
"अपब्रिंगिंगमध्ये ह्या बर्‍याचश्या गोष्टी कव्हर होतातच की?"
"नाही होत, अगदी कोणत्याही स्तरातील मुले मुली पाहिली तरी ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत तश्या कव्हर होत नाहीत. हा कोर्स डिझाईन करण्यामागे तज्ञांनी प्रचंड विचार केलेला आहे."
"ठीक आहे, आम्ही सांगतो विचार करून"
एकमेकांना अभिवादन करून ओम आणि काव्य हे दोघे रुईकरांच्या केबीनमधून बाहेर आले.
गाडीतून घरी जाताना काव्याला तिचे वडील सांगत होते.
"काही नाही ही सगळी ह्या लोकांनी काढलेली नवी नवी फ्याडं आहेत. एक सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्टचा कोर्स केला की इट इज इनफ! हे फी घेऊन मोकळे होणार आणि मुलींना अर्धवट वयातच स्वतंत्र विचारसरणी वगैरे शिकवणार! म्हणजे आई वडिलांनी शिकवलेले गेले कुठेच! क्काय? त्यात मुलींचा प्रॉब्लेम म्हणजे लग्न करून आणखी तिसर्‍याच कल्चरमध्ये जायचे असते. तिथले सगळे वेगळेच असते. तिथे ना ह्यांचा कोर्स उपयोगी ना माहेरची शिकवण! तिथे काय उपयोगी पडेल तर ऐनवेळी सून पैसे कमवून आणू शकेल की नाही हा मुद्दा! आणि असा लक्षणीय वगैरे फरक म्हणजे काय पडतो म्हणे मुलींमध्ये ह्या कोर्समुळे? ते काय मेझरेबल थोडीच आहे? कोर्स जॉईन करण्यापूर्वी ह्या मुलीचा कॉन्फिडन्स तीस युनिट्स होता आणि तिसर्‍या सेमिस्टरनंतर तो सेव्हन्टी फाईव्ह झाला वगैरे? ज्या मुलींना एकटेच राहायचे आहे, लग्नच करायचे नाही आहे वगैरेंसाठी ठीक आहे"
काव्याला वडिलांचे विचार पटत होते. ती होकारार्थी मान हालवत होती. तिला ते विचार पटतील अश्याच पद्धतीने तिला वाढवले गेलेले होते.
डिप्लोमा इन लिबरल आर्ट्स हा कोर्स जॉईन न करून त्यांनी स्वतःचे जेवढे नुकसान करून घेतले असेल त्यापेक्षाही जास्त नुकसान त्यांनी त्या कोर्सवर एकमेकात चर्चा करताना टीका करून, करून घेतलेले होते. कारण ह्या टीकेतून काव्याचे आणि तिच्या वडिलांचे तेच तेच विचार त्यांच्याच मनात पुन्हा पक्के होत होते जे चुकीचेही असू शकतील ह्याची त्यांना कल्पनाच नव्हती. काव्याने तर मनात ठरवलेलेही होते की मैत्रिणींना सांगायचे. 'नवीन कोर्सच्या नावाखाली स्टुडन्ट्सना जॅक ऑफ ऑल ट्रेड्स करून वाया घालवण्याचा प्लॅन आहे नुसता, पैसे वाया जातील त्या कोर्सला गेलीस तर'!
नवीन विचारांना क्षणभरही मनात स्थानही न देणारे लोक हे कितीही संपन्न असले तरी प्रत्यक्षात मागासच समजले जायला हवेत.
===========

सावट

सावट

प्रथमला निरोप द्यायला चित्रा दारात येऊन उभी राहिली. तो फाटकातून बाहेर पडेपर्यंत ती तिथेच थांबली. मनात बरीच कामं घोळत होती. प्रथम आता दोन तीन दिवस येणार नाही म्हणजे निवांतपणा होता. शांतपणे राहिलेलं काम हातात घेता येणार होतं. दार लोटून ती आत जाणार तेवढ्यात फाटकाच्या दिशेने परत येत असलेल्या प्रथमकडे तिचं लक्ष गेलं. पटकन पायर्‍या उतरत ती पुढे झाली.
"काय रे? काही राह्यलं का?"
प्रथमने तिचे दोन्ही हात हातात घेतले. त्याच्या नजरेतल्या व्याकुळपणाने तिचाच जीव घुसमटल्यासारखा झाला.
"प्रथम?" ती पुटपुटली.
"चित्रा, शक्य झालं तर मला माफ कर." झटकन मान फिरवून तो पुन्हा वळला. ती तशीच उभी राहिली. गोठल्यासारखी. हे काय नवीन? प्रथम काय म्हणाला? माफ कर? का पण? ओढणी सावरत ती फाटकाच्या दिशेने धावली. पण उशीर झाला होता. प्रथमची गाडी धुरळा उडवीत नाहीशी झाली होती. अंगातलं त्राण गेल्यागत ती मागे वळली. प्रथमच्या शब्दांचा काही केल्या अर्थ लागत नव्हता. फोन करावा? की तो येईपर्यंत वाट पाहायची? त्याचं बाहेर काही? दुसरा संसार? मूल? तिला त्याचा रागच आला. हे काय, माफ कर म्हणे. काहीतरी तुटक बोलून डोक्याला भुंगा लावून द्यायचा.
ती वेगाने प्रथमच्या खोलीत शिरली. टेबलावरचे कागद उलट सुलट करून त्यातून काही मिळतंय का शोधत राहिली. हातात येईल तो कागद पाहून ती भिरकावून देत होती. विचारांच्या नादात खोलीत झालेला कागदांचा पसाराही तिच्या लक्षात आला नाही. टापटिपीच्या बाबतीत काटेकोर असणारी चित्रा उन्मळून गेल्यासारखी खोलीतल्या कागदांवर स्वत:ला झोकून देत हमसून हमसून रडत राहिली. काहीवेळाने तिची तीच स्वत:ला सावरत उठली. खोलीचं दार बंद करुन पसारा नजरेआड टाकत दिवाणखान्यात आली. निरर्थक इकडे तिकडे पाहात राहिली. तिचं लक्ष कोपर्‍यातल्या टेबलाकडे गेलं. तिने दागिन्यांच्या नक्षीचे नमुने ठेवले होते त्यावर व्यवस्थित ठेवलेला लिफाफा उठून दिसत होता. चित्राला हसायला आलं. चित्राच्या हातात सहजासहजी पडावा या हेतूने त्याने तिच्या कामाच्या जागी तो लिफाफा ठेवला होता. तिने मात्र त्याच्या खोलीचा नक्षाच बदलून टाकला. तिचा अंदाज खरा होता तर. प्रथमला लेखणीचा आधार घ्यावा लागला होता. म्हणजे पुढचं सारं तिला शंका आली होती तसंच? कधी लिहिलं असेल त्याने हे पत्र? माफ कर म्हणाला म्हणजे काहीतरी अस्वस्थ करणारंच असणार. त्याची मनोवस्था जाणवली कशी नाही? तिने घाईघाईने पत्र उघडलं. उभ्या उभ्या वाचायला सुरु केलेल्या पत्रातल्या ओळी तिच्या नजरेसमोर अंधुक व्हायला लागल्या. चित्रा खुर्चीचा आधार घेत बसली. अंदाज चुकला म्हणून आनंद मानायचा की जे घडत होतं ते थांबवायचा प्रयत्न करायचा? खरंच होतं ते तिच्या हातात? तिचं तिलाच समजेना. पण मन मात्र घडत असलेल्या, घडून गेलेल्या घटनांचा, प्रसंगांचा आपोआप पुन्हा धांडोळा घ्यायला लागलं.
चित्रा पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. कथेतले प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहत होते. एकदम कुणीतरी पुस्तक ओढलं तसं तिने दचकून पाहिलं. प्रथम वैतागून तिच्याकडे पाहत होता.
"किती हाका मारायच्या चित्रा?"
"लक्षातच आलं नाही." ती एकदम ओशाळून म्हणाली.
"चल ना, भटकून येऊ या कुठेतरी." रविवारची दुपारची निवांत झोप काढून तो ताजातवाना झाला होता. घेतलेली गोष्ट वाचून तिला खरं तर पूर्ण करायची होती. पण तिने मोडता घातला नाही. पुस्तक बाजूला ठेवून ती उठली. स्वत:चं आवरुन प्रथम बरोबर निघाली. बाहेर पडल्या पडल्या प्रथमला कुणी ना कुणी ओळखीचं भेटत राहिलंच. चेस्मित हास्यहर्‍यावर  ठेवून चित्राही प्रत्येकाबरोबर होणार्‍या त्याच्या गप्पा ऐकत होती. प्रथम गपिष्ट तर चित्रा तशी अबोलच. त्याचं धबधब्यासारखं कोसळत राहणं तिला मनापासून भावायचं, त्याच्या लोकसंग्रहाचं कौतुक वाटायचं. त्याच्या प्रत्येकाती कौतुकाने शी होणार्‍या गप्पा कान देऊन ऐकत होती. रहदारीचा भाग काही वेळात संपून दृष्टीक्षेपात येणारा गडनदीचा पूल गप्पागोष्टींमुळे नजरेत यायला दहा पंधरा मिनिटं लागली. तो दिसायला लागल्यावर मात्र कधी एकदा पुलाच्या कठड्याला टेकतो असं होऊन गेलं चित्राला. प्रथमच्या बरोबरीने ती चालत असली तरी आता तिला त्या पुलाचीच ओढ लागली. नदीजवळच्या पुलाजवळ येऊन दोघं उभे राहिले. पुलाखालून वाहणार्‍या गडनदीच्या पाण्याकडे चित्रा पाहात राहिली. नदीच्या पाण्याचा आणि पाठीमागून रस्त्यावरुन जाणार्‍या एखाद्या गाडीचा आवाज इतकंच काय ते संगतीला आहे असं वाटत होतं. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. प्रथमने तिच्या तंद्रीचा भंग केला,
"उभ्या देवापर्यंत जाऊ या?" वाहणार्‍या पाण्याचा खळखळाट, डाव्या हाताला वळत गेलेल्या रस्त्यावर झाडामधून नजरेला पडणारी पण झटकन नाहीशी होणारी एखादी सायकल, आणि मध्येच संध्याकाळच्या येणार्‍या प्रकाशाची तिरीप डांबरी रस्त्यावर पडून काहीतरी चकाकल्यासारखा भास हे सारं अनुभवण्यात ती गुंग होती. प्रथमच्या शब्दांनी ती भानावर आली.
"चालेल." ती लगेच वळून चालायला लागली. प्रथमच्या हातात हात गुंफून मावळतीचा प्रकाश अनुभवत संथपणे चालत राहिली.
"काय काय येतं नाही नजरेच्या टप्प्यात या पुलावरुन? गडनदी, हळवलला जाणारा रस्ता, आर्यादुर्गेचं देऊळ. मला आवडतं हे दृश्य पाहायला. पण पुलावरुन भरधाव वेगाने जाणार्‍या गाड्यांची भिती वाटते. फार जोरात चालवतात." तिने नुसतीच मान हलवली. प्रथमनेही गप्पा मारण्याची इच्छा आवरली आणि शांतपणे तो तिच्याबरोबरीने चालत राहिला.
गर्द झाडीच्या रस्त्यावरुन पायवाटेवरुन थोडं आत चालत गेलं की विस्तीर्ण वृक्षांच्या सावलीतला उभा देव तिला आजूबाजूच्या वातावरणात गूढता निर्माण करणारा वाटायचा. पायाखालच्या पानांची सळसळ, लांबवरुन ऐकू येणारी एखादी हाक, नदीच्या आसपास कपडे धुण्याचा येणारा अस्पष्ट धपधप आवाज असं सगळं कानावर झेलत दोघं तिथल्या भल्या मोठ्या शीळेवर बसले. हाताच्या अंतरावर शांतपणे वाहणार्‍या गडनदीच्या पाण्याकडे दोघं मूकपणे पाहत राहिले.
"तुला पश्चाताप होतोय का चित्रा?" अचानक प्रथमने विचारलं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं.
"कशाबद्दल?"
"या आडगावात येऊन राहिल्याचा." चित्राने हसून मानेने नकार दिला.
"नक्की?" त्याने पुन्हा विचारलं.
"नाही रे. पश्चाताप कसला. तुला आवडतंय ना मग झालं तर."
"हेच, हेच मला आवडत नाही तुझं. मला आवडतं म्हणून तू करतेस का सारं?"
"नाही, असंच काही नाही."
"तू आनंदी दिसत नाहीस. चित्रा, मला ठाऊक आहे तुला यायचं नव्हतं रत्नागिरी सोडून. माझ्यासाठी म्हणून आलीस तू. खरं ना?"
ती काहीच बोलली नाही.
"इतका त्याग, कुढेपणा बरा नव्हे चित्रा."
"अरे, काहीतरीच काय बोलतोस?"
"मन मारुन तू काही करावंस अशी माझी इच्छा नाही. मी हे पहिल्यापासून सांगतोय. पण तुझ्या मनाचा थांगच लागत नाही कधीकधी."
काही न बोलता चित्राने त्याच्या हातात हात गुंफला.
"तुझं काहीतरीच. आणि आता आलोय इथे आडबाजूला तर बसू या नं निवांत. डोळे मिटून इथला शांतपणा अंगात अलगद झिरपू द्यावा असं वाटतंय. आपणही ह्या शांततेचा, गूढतेचा भाग व्हावा असं काहीसं." तिने त्याच्या खांद्यावर मान टेकून डोळे मिटलेच. तो ही नाईलाज झाल्यासारखा संथ वाहणार्‍या पाण्यावर नजर खिळवून बसून राहिला. एकमेकांना चिकटून बसलेल्या त्या दोघांची मनं मात्र दोन दिशेला भरकटली होती. प्रथमच्या मनात चित्राला बोलतं कसं करायचं याचा विचार चालू होता तर चित्राच्या डोळ्यासमोर कणकवलीला कायमचं यायचं ठरायच्या आधीचे दिवस तरळत होते.
त्या दिवशी कणकवलीहून तो आला संध्याकाळी. चित्राने नुकतंच काही दागिन्यांचं काम पूर्ण केलं होतं. त्यातली रंगसंगती, आकार ती पुन्हा पुन्हा निरखून पाहत होती. दुबईतल्या व्यावसायिकाला दागिने आवडले तर वर्षभर पुरेल इतकं काम हाताशी येणार होतं. ते काम तिलाच मिळेल याची तिला खात्री होती. थोडेफार बदल सुचवले तर ते करायची तयारी तिने मनात आधीच केली होती. आता फोटो काढून पाठवून द्यायचं एवढंच राहिलं होतं. प्रथम आल्या आल्या उत्साहाने ती बांगडी आणि हाराची नक्षी दाखवणार तितक्यात घरात शिरल्या शिरल्या तोच म्हणाला.
"चित्रा, खूप दिवसांपासून मनात काही घोळतंय. तुला केव्हा वेळ असेल तेव्हा बोलूया."
"महत्वाचं आहे? त्याच्या स्वरातला गंभीरपणा तिला जाणवला. तिने हातातले नक्षीचे कागद आणि दागिने बाजूला ठेवले.
"अगदी तसंच नाही. पण थोडी धाकधूक, शंका आहे मनात. तुझ्याशी बोलता बोलता मलाच उत्तरं सापडत जातात."
"मग बोल की आत्ताच. आहे वेळ मला. पण निदान हात पाय धू, काहीतरी खाऊन घे. यमुनाबाईंना सांगू का काहीतरी करायला?"
"नको. निघायच्या आधी खाल्लंय."
"ठीक आहे." चित्राने यमुनाबाईंना त्याचं सामान आत नेण्याची खूण केली आणि ती बसली.
"मी कणकवलीला कायमचं जायचं ठरवतोय." एक क्षणभर चित्राला तिचे कान लाल झाल्यासारखे वाटले. पण स्वत:ला सावरुन तिने विचारलं,
"असं अचानक? म्हणजे कधी ठरलं तुझं? आणि माझं काय?" तिच्या स्वरात शांतपणा असला तरी नकळत आवाज किंचित उंचावलाच. पण तिचं तिलाच जाणवल्यासारखं ती म्हणाली,
"नाही म्हणजे शेवटी तू विचार करुनच काय ते ठरवलं असशील म्हणा."
"आबा थकलेयत. विश्वासू माणसाच्या शोधात आहेत पण मलाच वाटायला लागलंय मीच घ्यावं आता हातात काम." तिच्या चेहर्‍यावरचे भाव निरखीत प्रथम बोलत होता,
"म्हणजे कुणाचाच तसा आग्रह नाही. अजून एखादं वर्ष रेटतील ते कारभार सुरळितपणे. पण कामं स्वीकारुन बसले आहेत. फक्त कणकवलीतली नाही तर आजूबाजूच्या गावातली. त्यांच्यासारखं काम कुणी करत नाही अशी ख्याती आहे ना त्यांची. आपल्या दृष्टीने साध्या नावाच्या पाट्या बनवायच्या असल्या तरी त्यात कलात्मकता पाहिजेच यावर ठाम आहेत ते. खरं सांगायचं तर हातात घेतलेलं काम झेपेल की नाही या विचाराने त्यांच्या मनावरचा ताण वाढतोय असं जाणवलं मला. तसाही मी अधूनमधून मदतीला जात असतोच. मग तिथेच बस्तान हलवलं तर? माझ्याशिवाय आहे कोण त्या दोघांना? आणि मुख्यं म्हणजे तू पण त्यांना काही कल्पना देऊ शकशील."
चित्रा काही बोलली नाही. एकदा वाटलं आपल्या कामाचं कारण पुढे करावं. पण कशाला? त्याबाबतीत काय करता येईल हे तिलाही ठाऊक होतंच की. पण त्याने हे ठरवूनच टाकलं आहे की तो विचारतोय? तिच्या मनातलं कळल्यासारखं प्रथम हसला.
"मी काही ठरवलेलं नाही. पण आज परत येताना जो अस्वस्थपणा आला त्यातून मोकळं व्हायचं होतं मला. तुझं म्हणणं ऐकायचं होतं. जो निर्णय घेऊ तो दोघांनी मिळून घेतलेला असेल. मी म्हणतोय म्हणून ते झालं पाहिजे असा माझा मुळीच अट्टाहास नाही. आणि लगेच काही ठरवायचं आहे असंही नाही. तू विचार कर. मग बोलूच आपण. जे माझ्या कामाच्या बाबतीत तेच तुझ्याही. तुझं काम सुदैवाने तिथेही करु शकतेस." त्याने तिच्या केसावर थोपटल्यासारखं केलं. आतून यमुनाबाईंची ताटं वाढल्याची हाक ऐकू आली तसं दोघंही उठलेच.
नकार द्यायचा? रत्नागिरीतलं सुरळीत आयुष्य सोडून पुन्हा घडी बसवायला जायचं कणकवलीला? तो जसा त्याच्या आई वडिलांचा विचार करतोय तसा मलाही माझ्या करायला नको का? आई तर एकटी राहतेय. कधी ना कधी आपल्याकडे येऊन राहायचा विचार तिच्या मनात डोकावला तर? येईल ती कणकवलीला? का जाईल बाबांकडे? पण नाही म्हणणं इतकं खरंच सोपं आहे? त्याच्या मनात जायचं असेलच तर मग वाद, भांडणं सुरु होतील. टोक गाठलं जाईल. म्हणजे अजून पर्यंत तसं कधी झालेलं नाही. समजूतदार आहे प्रथम. पण आई, वडिलांसाठी तो हा निर्णय घेतोय आणि आपण नाही म्हणायचं? उगाचच अडवण्यात काय अर्थ? ती एकदम लहान मुलीसारखी रडायला लागली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. त्या खोलीत वावरणारे आई, बाबा दिसायला लागले. आसपास वावरायलाच लागले ते तिच्या.
"गेंड्याचं कातडं पांघरलंय तुम्ही. किती काही बोललं तरी आपलं तेच खरं." बाबांच्या हातातलं वर्तमानपत्र खेचत आई म्हणाली.
"उत्तर दिलं नाही म्हणजे गेंड्याचं कातडं? तेच तेच ऐकून कंटाळतो म्हणून काही बोलत नाही. "
"बोलू नका हो. करुन दाखवा."
"ते दाखवतोच आहे. तुला दिसत नाही त्याला मी काय करु?" दोघांचे आवाज वाढायला लागले तसं तिथेच अभ्यास करत बसलेल्या चित्राने वहीत जोरजोरात काहीतरी खरडायला सुरुवात केली. आईने तिच्या पाठीत धपाटा घातला, हातातली वहीदेखील ओढली.
"चित्रा, काय हे गिरमिट करुन टाकलं आहेस. आणि किती जोर लावायचा तो. वही फाटेल." चित्रा तिथून पळालीच. स्वयंपाकघरात जाऊन तिने पाण्याचं भांडं तोंडाला लावलं. घशाला पडलेली कोरड गेली तरी पडद्याच्या आडून ऐकू येणार्‍या आवाजांनी तिच्या काळजाचे ठोके वाढले. ओट्याच्या बाजूला कोपर्‍यात भिंतीला टेकून ती शरीराचं मुटकुळं करुन बसली. आई इतकी का चिडते? बाबा सगळं शांतपणे ऐकत राहतात. बाबा नक्की काय चुकीचं करतात म्हणून दोघांचे सारखे वाद होतात? खरं तर नेहमी आईच त्यांच्यावर चिडते. याचा अर्थ तेच चुकत असणार. आई चिडली की तेही वाद घालतात. आई ऐकून घेत नाही हे लक्षात आलं की दारामागच्या खुंटीवर अडकवलेला शर्ट घालून निघून जातात. आई ते दाराबाहेर पडेपर्यंत बडबड करत राहते. आताही चित्राला माहीत होतं त्याचक्रमाने सारं पार पडलं. चित्रा आई स्वयंपाकघरात कधी येईल त्याची वाटच पाहत होती. तिने आल्याआल्या प्रश्न विचारायला सुरुवात केली. न चिडता, आदळआपट न करता आई तिच्याकडे पाहत राहिली. रोजच्या वागण्यापेक्षा आईचं हे वागणं वेगळं होतं. ती चित्राच्या बाजूला येऊन बसली आणि गुडघ्यात डोकं खुपसून रडायला लागली. चित्रा बावचळली. आईला रडताना ती प्रथमच पाहत होती. ती एकदम शांत झाली. मोठं होत तिने आपल्या आईला कुशीत घेतलं.
"रडू नको ना." स्वत:चे डोळे पुसत चित्रा आईला समजावीत होती. चित्राच्या केविलवाण्या चेहर्‍याकडे पाहात आईने अश्रू रोखले. काही न बोलता ती तशीच बसून राहिली.
"तू बाबांवर का चिडतेस? मला नाही आवडत."
"माझं चिडणं डोळ्यावर येतं. त्यांचं वागणं नाही दिसत कुणाला."
"काय करतात ते?"
"पिल्लू, तू फार लहान आहेस गं. नाही समजायचं तुला आता काही."
"सांग ना."
"तुझे बाबा कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत म्हणून चिडते मी."
"म्हणजे?"
"हे बघ, आजोबा मदत करतात आपल्याला. त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. तु्झे बाबा दर दोन चार वर्षांनी वेगवेगळ्या कल्पना मनात घेऊन नवीन काहीतरी व्यवसाय करायला निघतात. एकाचवेळी दोन तीन गोष्टी. त्यासाठी पैसे गुंतवावे लागतात. धंद्यात पैसा खेळता ठेवायला लागतो हे मान्य. पण हाताशी पैसा नसताना दुसरं काहीतरी सुरु करायचं कशाला?" चित्राला काडीचंही समजलं नाही. पण तरी तिने विचारलं.
"बाबा सांगतात आजोबांकडून पैसे आणायला?"
"नाही. जाऊ दे. तुला नाही समजायचं." आईने विषय संपवला. चित्राचा गोंधळ आणखीनच वाढला. तिने बाबा नाहीतर आजोबांनाच आईच्या म्हणण्याचा अर्थ विचारायचं ठरवलं.
पण ठरवलं तरी तसं झालं नाही. बाबा खूप उशीराच यायचे घरी. त्यात हल्ली हल्ली आणखी उशीर व्हायला लागला होता. आले की इतके कसल्यातरी विचारात असायचे की समोर जायलाच भिती वाटायची चित्राला. बर्‍याचदा चित्रा झोपेतून जागी व्हायची ती दोघांच्या आवाजाने. आजही तसंच झालं. मात्र आईच्या ऐवजी बाबांच्या आवाजाने ती दचकून उठली. आणि तशीच पलंगावर बसून राहिली. पडद्याच्या आडोशातूनही बाबा काय बोलतायत ते स्पष्ट ऐकू येत होतं.
"घरी आलो की तुझं सुरु. तुझ्या करवादण्याने सतत भेदरल्यासारखी वागत असते चित्रा. मी तिच्यासाठी गप्प बसतो. "
"खरं वाटेल कुणाला." आई खिजवल्यासारखी हसली. म्हणाली,
"माझा शब्द खाली पडू देत नाही तुम्ही."
"वाटतं ते सांगायचा प्रयत्न करतो. पण तुझं चालूच राहतं. मग गप्प बसतो. पण सततची धुसफुस, भांडणं, वाद याचा चित्रावर परिणाम होतोय ते कसं लक्षात येत नाही तुझ्या?"
"इतकी काळजी आहे तर ही वेळच येऊ न देण्याची खबरदारी का नाही घेतलीत? सगळे धडे मला."
"मी काही केलं तरी तुला समाधान मिळायला हवं ना."
"समाधान मिळेल असं कर्तुत्व गाजवा की. कुणी नको सांगितलंय."
"अगं बाई, तुझ्या या अशा बोलण्याचं सतत दडपण असतं माझ्या मनावर. दोन तीन व्यवसाय एकावेळी मी नीट सांभाळतो तरी सतत टोचून बोलतेस. बरं आपल्याला काही कमी आहे का? नाही. पण एकहाती तू मागशील तेवढी रक्कम ताबडतोब हजर करता येत नाही या एकाच मुद्यावर सतत कटकट असते तुझी. व्यवसायात पैसा फिरता राहतो हे कितीवेळा तुला सांगायचं तेच समजत नाही."
"तो फिरता पैसा पुरवावा लागतो माझ्या वडिलांना."
"मी गेलोय कधी त्यांच्याकडे मागायला? गेलोय कधी?"
"तुम्ही नसाल गेला. पण वापरता ना त्यांनी दिलेले पैसे."
"मी वापरत नाही. तुझ्याकडे असतात ते पैसे. मी घेऊ नको सांगूनही तू घेतेस. पुन्हा सांगतोय, माझ्या अंगात संसार चालवण्याची धमक आहे."
आई काही बोलली असली तरी चित्राच्या कानापर्यंत ते पोचलं नाही. पण एकदम ओरडण्याचा आणि रडण्याचाच आवाज यायला लागला. कधी नव्हे ते बाबा तारस्वरात ओरडत होते.
चित्रा घाबरुन थरथरायला लागली. तिला बाबांच्या कुशीत शिरावंसं वाटत होतं. ती जवळ असली की बाबा एकदम शांत होतात ते ठाऊक होतं तिला. पण बाबांचा इतका चढलेला आवाज ती पहिल्यांदाच ऐकत होती. ती तशीच बसून राहिली. बाजूची चादर तिने अंगावर ओढून घेतली. भिंतीला टेकून ती कानावर आदळणारे शब्द झेलत राहिली. कितीवेळ गेला कुणास ठाऊक पण आई खासकन पडदा बाजूला करुन बाहेर आली. कपाट उघडून तिने आतल्या साड्या बाहेर फेकायला सुरुवात केली. चित्राच्या मुसमुसण्याचा आवाज कानावर पडला तसं तिच्याकडे न पाहताच आई ओरडली,
"ऊठ लगेच. आपल्याला जायचंय इथून."
"कुठे जायचंय?"
"आजोबांकडे."
"बाबा पण येतायत?"
"नाही. एकही प्रश्न विचारु नकोस आता. कृपा कर." चित्रा बाबांच्या दिशेने धावली. बाबा खुर्चीत मान खाली घालून बसले होते. तिने त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यांनीही तिला आवेगाने जवळ घेतलं.
"मला नाही जायचं आजोबांकडे." ते काही न बोलता तिला थोपटत राहिले. आई पायात चप्पल घालून दारात उभी राहिली तसं बाबांनीच चित्राला खूण केली. तेही उठले.
"जाऊ नकोस. उद्या शांतपणे बोलू आपण. इतक्या रात्री आलेलं पाहून घाबरतील घरातली." आई सरळ पायर्‍या उतरायला लागली तसं बाबाच त्या दोघींबरोबर खाली आले. रिक्षा थांबवून दोघींना बसवून देत ते तिथेच उभे राहिले.
"तुम्ही उद्या मला न्यायला या बाबा. शाळा चुकवायची नाहीये मला." रिक्षा सुरु झाली तसं तिने बाहेर डोकं काढत रडत म्हटलं. बाबांनी मान डोलावली. आईने हाताने तिला आत ओढलं आणि ते घर कायमचं सुटलं.
बाबा न्यायला येतील या आशेवर होती चित्रा. तिला वाटलं तसं बाबा आलेही दुसर्‍यादिवशी. पण तिच्याकडे लक्ष देण्याच्या मन:स्थितीत कुणीच नव्हतं. बाबा सतत आजोबांशी काहीतरी बोलत होते. आई मध्ये पडली की आवाज चढत होते. आजी मात्र तिला तिथे फिरकूच देत नव्हती. त्या दिवशी चार पाच तास तरी असेच गेले असावेत. निघायच्या आधी बाबा तिला भेटले ते आता ती इथेच राहील, तिची शाळा बदलेल पण ते तिला भेटत राहतील हे सांगण्यापुरतं. बाबा गेल्यानंतर कितीतरी दिवस आईने रडून काढले. चित्राचंही नवीन शाळेत लक्ष लागत नव्हतं. ती शाळेतून आली की पुस्तकात डोकं खुपसून बसे. गोष्टींमध्ये जीव रमवायचा प्रयत्न करी. मनात आई, बाबांबद्दलचा राग साठत चालला होता. तो वागण्यातही डोकावायला लागला. उलट उत्तरं, निष्काळजीपणा हे नित्याचं झालं. कधी घरकोंबड्यासारखं वागायचं तर कधी शाळेतल्या वाचनालयात जितक्या उशीरापर्यंत बसता येईल तितका वेळ तिकडेच काढायचा. वाचनालयात झालेल्या ओळखीतून बाहेर उंडारत रहायचं. विचित्र वळणावर चित्राचं आयुष्यं खेचलं गेलं. घरातलं वातावरणही बदललं. सुरुवातीला रडून दिवस काढणारी आई, आजोबांच्या व्यवसायात मदत करायला लागली. बराचसावेळ ती तिकडेच घालवे. चित्रामधलं लक्ष काढून घेतल्यासारखं वागत असली तरी चित्राच्या सार्‍या गरजा भागवत होती ती, मागेल ते देत होती. फक्त तिचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न आईकडून होत नव्हता. लेकीसाठी वेळ देता येत नव्हता. बाबा अधूनमधून उगवत. तिला घेऊन बाहेर जात. बाहेर जेवण, आइसक्रीम ती जे मागेल ते मिळे. चित्राला आत्तापर्यंत जे मिळालं नव्हतं ते विनासायास हजर होत होतं, म्हटलं तर भौतिक सुख कधी नव्हे ते आपणहून चालून येत होतं. पण अधूनमधून मिळणारा सुखाचा घास तेवढ्यापुरता आवडला तरी आई, बाबांच्या सहवासाला ती आसुसली होती. प्रत्येकवेळी बाबा सोडायला आले की तिला वाटायचं, सगळ्यांनी मिळून पहिल्या घरी जावं. पुन्हा तिथल्या शाळेत जावं, मैत्रिणींना भेटावं. पण आई, बाबा स्वतंत्ररीत्या कितीही तिला पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करत असले तरी एकत्र आले की वाद विवादाच्या फैरी झडत. आता यात आजोबांचाही समावेश झाला होता. आजी या सगळ्याला कंटाळली आणि एक दिवस नेहमीचं नाटक सुरु झाल्या झाल्या तिने चित्राला बोलावलं.
"हिच्या समोरच ठरवा काय करणार आहात पुढे. फार झाली ओढाताण तिची. इथे येऊनही वर्ष होऊन जाईल. दोन्ही डगरीवर पाय देऊन उभं राहणं दोघांनीही थांबवा." काही वेळ कुणीच काही बोललं नाही. मग बाबाच म्हणाले,
"चित्रा, तुझ्यावर अन्याय होतोय याची कल्पना आहे. माफी तरी कुठल्या शब्दांनी मागू? पण याला अंत नाही. आतापर्यंत म्हटलं तर आम्ही दोघंही प्रयत्न करत राहिलो. पण प्रेम, तडजोड यापेक्षा अहंकार वरचढ झालाय. या क्षणी माघार कुणीही घेतली तरी ती तात्पुरतीच असेल. प्रत्येक वेळच्या यातनामरणापेक्षा एकदाच सोक्षमोक्ष लागणं उत्तम. आमचे मार्ग इतके बदलले आहेत की ते पुन्हा एकत्र येतील असं वाटत नाही." बाबांचं बोलणं समजायला कठीण जात असलं तरी त्यातला अर्थ चित्राला व्यवस्थित कळला. घटस्फोट. आई - बाबा घटस्फोट घेणार. तिला रडावंसं वाटत होतं. पण घरातल्या मोठ्यांसमोर रडण्यात अपमानही वाटत होता. ती बाबांच्या नजरेला नजर देत तशीच बसून राहिली. आईने काही न बोलता चित्राचा हात हातात धरला. चित्राने तो झिडकारलाच. धावत ती आजीच्या खोलीत शिरली. धाडकन पलंगावर अंग टाकून रडत राहिली. पाठीवर फिरत असलेल्या हातानेच आजी खोलीत आल्याचं तिला कळलं. हळूहळू ती शांत झाली.
"वेगळे होणार का गं आई बाबा?"
"तेच या परिस्थितीत योग्यं नाही का चित्रा? वर्षभर वाट पाहिली. पण काही बदलेल असं वाटत नाही. घरी तेच इथे येऊनही तेच. कुणालाच सुख नाही."
"आजी, माझ्या संसारात मी नाही असं वागणार. ही वेळच येऊ देणार नाही. का असं वागतात गं दोघं? माझं चुकलं की ओरडायचे, मला फटके मिळायचे लहान असताना. ठाऊक आहे ना?"
"हो."
"मला पण दोघांवर आरडाओरडा करावंसं वाटतंय. फटकावून काढलं पाहिजे दोघांनाही."
"चित्रा..." आजीच्या स्वरातला कठोरपणा जाणवला तशी चित्रा गप्प झाली.
"कुणाचं आणि काय चुकलं, चुकतंय ही चर्चा निरर्थक आहे. टाळी एका हाताने वाजत नाही हेच खरं. पण यातून सर्वांनाच मार्ग काढायचा आहे. तुझी आई, आजोबांना मदत करेल. तिला आता स्वत:च्या पायावर उभं राहणं जितकं गरजेचं आहे तितकीच आवश्यकता तुझं वागणं बदलण्याची आहे चित्रा."
"मी काय केलं? चुकतंय ते त्या दोघाचं."
"त्यांच्या चुकीची शिक्षा तू त्यांना भरकटल्यासारखं वागूनच द्यायला हवी असं आहे का?"
"पण मी..."
"लहान नाहीस तू आता. तुला चांगलं कळतंय मला काय म्हणायचं आहे ते." चित्रा काही न बोलता बसून राहिली. आजी उठून पुन्हा बाहेर निघून गेली. पण नाकारायचं म्हटलं तरी आजीचं बोलणं तिला पटत होतं. निदान स्वत:च्या आयुष्याचा ताबा तिने स्वत:च घ्यायला पाहिजे होता. पण म्हणजे काय करायचं? ती जास्तीत जास्त आजीच्या आसपास घालवायला प्रयत्नपूर्वक शिकली. विस्कटलेली घडी सुरळीत व्हायला चार पाच वर्ष लागली. प्रत्येकाची दिशा वेगळी असली तरी निदान मार्ग हाती गवसले होते. इथपर्यंत पोचेतो सर्वांनीच बरंच काही गमावलं होतं त्यामुळे आता हातातून काही निसटू न देण्याची खबरदारी मन आपोआप घ्यायला शिकलं होतं. आजीच्या पंखाखाली चित्राला सुरक्षित वाटत असतानाच अचानक आजी गेली. काहीही हासभास नसताना गेलेल्या आजीचं जाणं चित्राला पचवणं फार जड गेलं. पण जाता जाता आजीने विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवून दिली होती. चित्राही प्रयत्नांची पराकाष्ठा करुन ती घडी आता विसकटू देणार नव्हती. बाबा अधूनमधून घरी येत राहिले. आले की आजोबांशी बोलत बसायचे. आईच्या स्वतंत्र बाण्याचं कौतुक करायचे. थकल्या डोळ्यांनी आजोबाही बाबांच्या यशाचं कौतुक करायचे. आई फारशी बोलत नसली तरी बाबा आले की तिचा चेहरा खुलायचा. गुण दिसायला, कर्तुत्व पटायला खरंच लांब जावं लागतं एकमेकांपासून? चित्राच्या घराबाबतीत तरी निदान तसं झालं होतं. पाहताना चित्राला वाटायचं, आजी हवी होती. खूश झाली असती. हल्ली हल्ली तर तिला वाटायला लागलं होतं आई, बाबांनी पुन्हा एकत्र यावं. नाहीतरी आता किती छान जमतं दोघांचं. मनातला विचार ओठावर येईतो आजोबांनी आजीच्या वाटेवर पाऊल टाकलं. आता तर चित्राला आईला बाबांच्या आधाराची खरी गरज आहे असं प्रखरतेने वाटत होतं. शेवटी एकदा धाडस करुन तिने विषय काढला.
"बाबा, आता तुम्ही इकडेच का राहत नाही? आईला मदत हवीच आहे तिच्या कामात." आईने आश्चर्याने चित्राकडे पाहिलं.
"अगं काय बोलतेयस तू चित्रा? तुझ्या बाबांना वाटेल मीच बोलले हे तुझ्याशी. कुठून हे वेड घेतलंस?"
"वेड? नाही गं. मला तीव्रपणे वाटलं तेच करतेय. आई, मला तुम्ही दोघंही हवे आहात गं. आता काही मी लहान नाही. लवकरच शिक्षणही संपेल माझं. जुने दिवस आठवते तेव्हा तुमच्या दोघांचं वागणं, माझं तुमच्याबरोबर बदलत गेलेलं नातं हे जसं लक्षात येतं तसं त्यावेळची तुमची मन:स्थिती, तुमच्या दोघांची ओढाताण हे मला आता कळतं. बाबांच्या मनातलं कायमचं एक अपराधीपण आणि तुझं सततचं वैतागलेपण. कोण बरोबर, कोण चुक याचा हिशोब या नात्यात नाहीच करता येत. तुम्ही वेगळं व्हायचं ठरवलंत त्याची नक्की कारणं माहीत नसली तरी अंदाज आहे मला. दोघांची बाजूही आता समजू शकते मी. नात्याचा ताण तुम्हाला झेपला नाही हेच खरं. घटस्फोट झाल्यावर, दूर गेल्यावर कसं सगळं सुरळीत झालंय. तुमचं तुम्हालाही हे जाणवलं असेलच ना? तुमच्या दोघांच्या वागण्याची झळ मला लागत होतीच, तुम्हालाही ते समजत असणारच. बाबा, तुम्ही माझ्या वाट्टेल त्या मागण्या पूर्ण करायचात ते त्यावेळेस आवडायचं मला. आई, तुला वेळ द्यायची इच्छा असूनही जमायचं नाही आणि त्यामुळे आणखीनच चिडचिड व्हायची तुझी. त्या त्या वेळेस राग यायचा पण आता तुम्ही एकमेकांना समजून घेताना दिसता ना, तेव्हा सगळं विसरुन जावंसं वाटतंय. आणि आई, मी इथून गेले की तू अगदी एकटी पडशील गं." चित्रा आईकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहात राहिली. पोटच्या मुलीमध्ये आलेलं प्रौढपण पाहता पाहता आईच्या चेहर्‍यावर हसू उमटलं,
"तुझं तू जमवलं आहेस का कुठे? ते सांगण्यासाठी हा मार्ग?" चित्रा गडबडीने म्हणाली.
"नाही गं. म्हणजे ते ही सांगायचं आहेच. पण आत्ता जे बोलले नं मी ते खरंच आतून आतून जाणवलेलं मला. आजी, आजोबा गेल्यानंतर तुमच्यातला सुसंवाद जाणवतो, आवडतो मला म्हणून मी मागे लागले आहे."
"बरं, बरं, आता मुद्यावर या." बाबा हसून म्हणाले.
" हो, प्रथमशी तुमची भेट कधी घालून देऊ ते दोघांनी सांगा मला." चित्रा पुटपुटली.
"हं, आता खरं बाहेर पडलं. चित्रा, प्रथमला भेटूच आम्ही. पण आमचं दोघाचं पुन्हा एकत्र येणं अशक्य आहे बेटा. आहे तेच चालू राहणं योग्यं. आता तुझी आई काय, मी काय पुन्हा लग्न करु असं वाटत नाही. पण तुटलेला संसार, मनं सांधताना जी कसरत करावी लागते त्याची तयारी नाही माझी. तुझी आई आता माझी मैत्रीण आहे. ती तशीच राहू दे. त्यातच जास्त सुख आहे. हे माझं मत. तुझ्या आईला काय वाटतं ते नाही ठाऊक मला."
"अगदी तेच म्हणणं आहे माझं." दुजोरा देत आई म्हणाली.
"आता पुन्हा हा विषय नको. प्रथमला केव्हा आणते आहेस भेटायला? त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला." प्रथमचं नाव काढल्यानंतर चित्रा त्या दोघांची झालेली भेट, त्याच्या घरची मंडळी या बद्दल बोलण्यात रंगून गेली.
प्रथमला चित्रा घरी घेऊन आली आणि तो मग येतच राहिला. शिक्षण पूर्ण होऊन, स्वत:च्या पायावर उभं राहिल्यावर लग्न होईतो मध्ये तीन चार वर्ष गेली. लग्न झाल्यावर मुंबई सोडून रत्नागिरीला जायचं आहे हे ठाऊक असूनही प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा चित्रा थोडीशी भांबावली पण वाटलं तितकं रत्नागिरीत स्थिर होणं जड गेलं नाही. रत्नागिरीला येऊन दोन वर्ष झाली आणि प्रथमने कणकवलीला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. अर्थात तिच्याच संमतीने. कणकवलीला येऊनही वर्ष झालं होतं. प्रथमच्या आई, बाबांनी त्या दोघांचा संसार स्वतंत्र राहिल याची काळजी घेतली होती. गावातच पण वेगळा संसार होता दोघांचा. असं सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच प्रथमने असं का करावं? लाल झालेले डोळे चोळत ती त्याने लिहिलेलं पत्र पुन्हा वाचायला लागली.
प्रिय चित्रा,
गेलं वर्षभर मी झगडतोय. नक्की काय करावं ते समजत नाही. तुझ्याशी बोलायचं धाडस नाही म्हणून हे पत्र. पत्र लेखन बरं असतं. एकतर्फी असतं. मनातलं सारं लिहिता येतं. चेहर्‍यावरचे भाव निरखीत शब्द बदलावे लागत नाहीत. जे शब्द मी अनेकदा ओठावर येऊनही गिळून टाकले ते इथे लिहितोय. लिहिताना तुझा चेहरा समोर येतोय. तुला माझ्या शब्दांमुळे किती धक्का बसेल याची कल्पनाही करवत नाही. पण मला वाटत नाही आपलं जमेल. मला कल्पना आहे मी किती दुखावतोय तुला. जे आपल्या दोघांच्या बाबतीत कधीही होऊ नये याची तू आपल्या संसारात दक्षता घेत आलीस त्याच परिस्थितीत मी तुला ढकलतोय. मला ठाऊक आहे, तुझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला त्या वाटेवर कधीही पाऊल टाकायचं नाही असा तुझा निर्धार आहे पण त्या निर्धाराचं सावट आपल्या संसारावर पडतंय हे लक्षातच आलं नाही तुझ्या. खूप प्रयत्न केला मी. पण आहे या परिस्थितीत बदल होईल असं वाटत नाही. तू स्वत:ला हरवून बसली आहेस चित्रा. म्हणजे तसं सगळं छान आहे. पण जिथे मतभिन्नतेचा प्रश्न येतो तिथे सारं बदलतं. मतभेद होताच कामा नयेत याची काळजी घेण्याचा तुझा खटाटोप असतो. विचार करतो तेव्हा वाटतं, तुझ्या आई, वडिलांच्या सततच्या वाद विवादाला कंटाळली होतीस तू. त्याचाच हा परिणाम असेल का? म्हणजे तसं तू कधी सांगितलं नाहीस त्यामुळे कदाचित ठरवून नसेलही होत तुझ्याकडून पण वाद टाळतेस तू हे अगदी स्पष्ट जाणवतं. एक दोन वेळा मी विचारलंही तुला कारणांबद्दल. पण धड उत्तर नाही देता आलं तुला. कुठल्याही निर्णय प्रक्रियेत मला तुझा सहभाग हवाय. नुसतं हो ला हो नको चित्रा. आपण एकमेकांचे जोडीदार आहोत. तू माझी गुलाम नाहीस. लग्न झालं म्हणून प्रत्येक गोष्टीला मान तुकवलीच पाहिजे असं कुणी सांगितलं तुला? गेल्या दोन वर्षात एकही गोष्ट मला आठवत नाही ज्याला तू विरोध केलायस. तुझ्या डोळ्यात नाराजी उमटते पण ती तू शब्दात व्यक्त होऊ देत नाहीस. असं का? मी नाना तर्‍हेने हे तुझ्यापाशी खरं तर बोललोय. कितीतरी वेळा अगदी सष्टपणे. असं वागू नकोस म्हणून बजावलं आहे, समजावलं आहे. जर माझं ऐकायचं असंच ठरवलं आहेस तर मग हे का ऐकत नाहीस? भांड ना कडकडून माझ्याशी. आवडेल मला. कितीतरी वेळा तू वाद घालावास म्हणून मी निरर्थक विधानं केली पण आपल्या दोघांमध्ये वादाला जागाच द्यायची नाहीस हे तुझ्या मनात पक्कं ठसलेलं आहे. चुकीचं आहे ते. सांगून सांगून थकलो मी आता. दोन माणसं एकत्र आली की तडजोड करावी लागतेच पण त्यालाही मर्यादा असते. अस्तित्व हरवून गेलेली कळसूत्री बाहुली नकोय मला चित्रा. हाडामांसाचं माणूस हवंय. चिडणारं, रडणारं, हट्ट करणारं, वेळ प्रसंगी कान उपटणारं. आणि नेमकं तेच या लग्नाने मी हरवून बसलोय आणि म्हणूनच चित्रा, मला वेगळं व्हायचंय. मला घटस्फोट हवाय.
चित्राने हातातल्या कागदाचा बोळा केला. रडत रडत ती ओट्याच्या बाजूला कोपर्‍यात गुडघ्यात डोकं घालून बसली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. चुरगळलेल्या कागदाचा बोळा तिने थरथरत्या हाताने पुन्हा उघडला. ज्या शब्दाला आयुष्यात कधीच थारा नाही असा विश्वास होता चित्राला तोच शब्द तिच्या डोळ्यासमोर पुन्हा नाचत होता, प्रथमचा पत्रातून उतरलेला आवाज पुन्हा पुन्हा कानावर आदळत होता. घटस्फोट. मला घटस्फोट हवाय!