Tuesday 22 July 2014

ती आई होती म्हणून.....

३ तास होऊन गेले तरी गाडी जागची हलत नाही हे पाहून नेहाची अस्वस्थता शिगेला पोहोचली. या ओव्हरहेड वायर्सना तुटायला आजचाच मुहुर्त बरा साधायचा होता, ती मनातल्या मनात धुसफुसली. पण असा त्रागा करून काही उपयोग होणार नाही हे जाणवून ती शक्य तितक्या संयमाने गाडी सुरु होण्याची वाट पहात बसली.
जळगांवमध्ये चाळीसगांवच्या पुढे खर्डा नामक एका गावातील सुधारणांची पाहणी करुन अहवाल सादर
करण्याची ऑर्डर मिळाली होती नेहाला वरिष्ठांकडून, म्हणूनच हा प्रवास-प्रपंच.
या अचानक झालेल्या खोळंब्यामुळे गाडी मुक्कामाच्या ठिकाणी अगदी अपरात्री पोहोचणार होती. बरं, गावंही लहानसं, मूलभूत सोयीच केवळ असलेलं, त्यामुळे मध्यरात्री आपण मुक्क्कामी कसे पोहोचणार हा घोरच होता.
तब्बल चार-साडेचार तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर गाडीने शिट्टी वाजवली आणि नेहाचा जीव भांड्यात पडला. अपेक्षेप्रमाणे गाडी मध्यरात्री १.३० च्या सुमारास खर्डा येथे पोहोचली. नेहा एकटीच उतरली या आडगावी, फलाटावर चिटपाखरू नाही. स्टेशन मास्तरांच्या कचेरीत जाऊन नेहाने गावाकडे जाण्याचा मार्ग, हॉटेलचा पत्ता वगैरे विचारून घेतले, पायीच जावे लागेल, वाहनाची सोय नाही हेही समजले तिला.
गुडूप अंधारात हरवलेल्या पाऊलवाटेवजा एकमेव कच्च्या रस्त्यावरून नेहा चालू लागली. दूरवर मिणमिणते दिवे दिसत होते, एकंदर तेथपर्यंत चालण्याशिवाय पर्याय नव्हता तर... या अनोळखी गावी आपण मध्यरात्री एकट्या चाललोय, कुठून कुणी आडवे आले, चोरी वगैरेच्या उद्देशाने चाकूचा धाक दाखवून तर...? भीतीने गाळण उडाली नेहाची. नाही म्हणायला रातकिड्यांची किर्र - किर्र होती साथीला आणि मधुनच उडणारी वटवाघळे.... अवचित येणारी वार्याची झुळूक आणि पानांची सळसळ....बाकी सन्नाटा....
किती भयाण वाटतंय... घसा सुकला नेहाचा. शक्य तितक्या झपाझप पावले टाकून वस्ती गाठायची अशा प्रयत्नांत ती चालू लागली आणि अचानक काही कळायच्या आत एक तीव्र वेदनेची सणक मस्तकापर्यंत भिनली नेहाच्या, पायाला कुठल्याशा दगडाची ठेच लागली होती, "आई गं" नेहा कळवळली आणि तोल जाऊन खाली पडत असलेल्या नेहाला हाताचा आधार मिळाला. नेहाने दचकून पाहिले तर एक शांत, प्रसन्न चेहरयाची स्त्री तिला आधार देत होती. साडी, ठसठशीत कुंकू, वत्सल नजर अशी ती स्त्री पाहून नेहाला आईचीच आठवण झाली आणि मनोबळ मिळालं. त्या स्त्रीने नेहाची विचारपूस केली. नेहाने सर्व सांगून हॉटेलची चौकशी केली.
"आगं पोरी,चल तर खरी माज्यासंगं आन हाटल कशापायी गं या सखूचं घर असताना? , चल गुमान माज्या घरला" असे म्हणत तिने नेहाला हाताला धरुन सोबत नेले. काही अंतर चालल्यावर एक पिंपळपार लागला आणि तिथून वळसा घेताच एक बैठा वाडा दॄष्टीपथात आला. अंगणात छोटेसे तुळशीवृंदावन व त्यापाशी दिवा तेवत होता. नेहा काहीशी धास्तावलेलीच, अशा अनोळखी व्यक्तीच्या घरी जाणे योग्य नाही असे वाटत होते तिला. पण तसेही इथे तर सारेच अनोळखी त्यापेक्षा बाई-माणसाबरोबर जाणे बरे असा विचार केला नेहाने . बाईही तशी साधीच वाटत होती. काही छक्के - पंजे तिच्या मनातही नसतील हे जाणवले नेहाला. सखूबाई बळेच नेहाला हाताशी धरून वाड्यात प्रवेशली.
छोटंसं सुबक घर, जुन्या काळातलं वाटावं असं. बैठकीच्या खोलीत नेहाला बसवून सखू तिच्यासाठी पाणी घेऊन आली. नेहाची जखम धुवून तिला मलमपट्टी करून दिली. नेहाला संकोच वाटू नये याची सखूमावशी काळजी घेत होती. या अनोळखी गावी कसलीही ओळख-देख नसतांना दाखवलेल्या या जिव्हाळ्याने नेहा गहिवरुन गेली. म्हणाली, "सखूमावशी, मी एकटी त्या रस्त्यावर फार घाबरले होते, देवासारख्या धावून आलात माझ्या मदतीला, खूप उपकार झाले." सखूमावशी म्हणाल्या,"द्येवावर इस्वास हाय व्हय तुझा?'" "हो तर" नेहा बोलली, "माझी आई म्हणते," त्याच्यावर विश्वास असू द्यावा, तो येतोच कोणत्या न कोणत्या रुपात आपल्या मदतीला, जशा आज तुम्ही आलात माझ्यासाठी".
"लई गुनाची हायेस गं" असं म्हणत सखूमावशीनी तिच्या चेहरयावरुन हात फिरवला आणि कानशिलावर बोटे मोडली. नंतर मावशींनी तिच्यासाठी गरमागरम भाकरी भाजल्या. पिठलं, भाकरी, मिरचीचा ठेचा असे गावरान जेवण जेवून नेहा तृप्त झाली. तिने सखूमावशींना विचारले की " तुम्ही एकट्या रहाता का इथे? आणि अशा अपरात्री रस्त्यात काय करत होतात?" सखूमावशी थबकली, म्हणाली, "न्हाय बा, माझी बी येक लेक हाय तुज्यावानी, बूकं शिकलेली, शेरात कामाला असते न्हवं का. आन म्या तुझी हाक ऐकुन आले शान बघायला कोन ते, तर तू व्हतीस". तु आज माझ्या पोरीच्याच खोलीत झोप कशी."
इतके बोलून सखूमावशींनी नेहाला आपल्या लेकीच्या खोलीत नेले. खोली साधी, नीटनेटकी, एका भिंतीवर एका तरुणीचे तैलचित्र होते. हीच ती सखूमावशींची मुलगी असावी असा अंदाज बांधून नेहा आजच्या सबंध दिवसातल्या घडामोडी आठवत पलंगावर विसावली. काही वेळातच तिचा डोळा लागला.
सकाळच्या उन्हाची तिरीप चेहरयावर पडल्यामुळे नेहाला जाग आली. चांगलंच उजाडलं होतं, आपल्याला निघायला हवं सरपंचांच्या कचेरीत, नेहाने विचार केला व ती भराभर आवरू लागली. सखूमावशींचा कानोसा घेत ती बाहेर आली, पण त्या कुठेच दिसेनात घरात आणि हो रात्री इतके छान वाटणारे घर आता दिवसा उजेडी विचित्र वाटत होते, जणू काही कैक वर्षे माणसाचा वावरच नसावा असे.... तिची नजर सखूमावशींना
शोधत होती, राहण्या-खाण्याचे पैसे तर त्यांना द्यायलाच हवे होते. आधार दिल्याबद्दल आभारही मानायचे होते. आपण तर आज सबंध दिवस कामाच्या धांदलीत असू आणि लगेच संध्याकाळच्या गाडीचे परतीचे तिकीट आहे आपले, तेव्हा आताच सखूमावशींचा निरोप घेणे योग्य.
सामान घेऊन नेहा बाहेर अंगणात आली आणि खाडकन घराचा दरवाजा बंद झाला. नेहा दचकलीच त्या आवाजाने. अंगणही सुने-सुने वाटत होते, तुळस साफ वठली होती, रात्री हे सर्व आपल्याला किती सुंदर सारवल्यासारखे वाटले होते. पण इथे तर पालापाचोळा, धूळ यांचेच साम्राज्य दिसतंय. नेहा अवाक होऊन विचार करत करतच काही अंतरावर असलेल्या पिंपळपारापाशी पोचली.
पारावर काही गावकरी बसले होते. त्यांना विचारून तिने सरपंचांची कचेरी गाठली. आता सरपंचांकडूनच सखू मावशीचा ठावठिकाणा शोधून काढू. हजार - बाराशेंच्या वस्तीचं तर हे गाव, नक्की ओळखत असतील तिथली लोकं सखूमावशींना असा विचार करतच नेहा कचेरीत प्रवेशली.
सरपंचांना ओळख सांगताच त्यांनी तिचे स्वागत केले व तिला हवी असलेली सर्व कागदपत्रे दाखवण्यास सुरुवात केली. काम उरकत असतानाच सरपंचांनी नेहा रात्री कुठे राहिली याची चौकशी केली आणि नेहाला सखूमावशींची पुन्हा आठवण झाली. तिने रात्रीचा सारा वृत्तांत कथन केला आणि सखूमावशी कुठे असतील आता तेही विचारले. सरपंच व इतर सहकारी अवाक होऊन हे सारे ऐकत राहिले. त्यांचा विश्वास बसत नव्हता नेहाच्या बोलण्यावर मात्र सखूमावशींचे नेहाने केलेले वर्णन मिळतेजुळते होते.
विचारमग्न झालेले सरपंच स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटू लागले, "आली असेल, सखूच आली असेल, आपल्या पोरीला नाही वाचवू शकली बिचारी, पण लेकीसारख्या तुम्हाला मदत करायला तत्परतेने आली, आईचं काळीज आहे ना शेवटी....."
नेहाला काही उलगडा होईना, तिने खोदून खोदून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शेवटी काहीही न बोलता सरपंचांनी एक रजिस्टरवजा बाड तिच्यापुढे धरले आणि त्यातील एका ओळीवर तिचे लक्ष वेधले.
त्यात आठ वर्षांपूर्वीची तारीख असलेली एक नोंद नेहाला मिळाली:-
मयत व्यक्तीचे नाव- श्रीमती सखूबाई थोरात
मृत्यूचे कारण- मुलीच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्यामुळे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

मी नाही बोलणार जा........

अवनी आज प्रचंड घुश्श्यात होती. घरी आल्या आल्या तिने सोफ्यावर दफ्तर आपटलं आणि तडक वर आपल्या खोलीत निघून गेली. ज्योती किचनमधुन बाहेर पाणी घेउन येईपर्यंत वरुन धाडकन दरवाजा आपटल्याचा आवाज आला. तिला आजच हे प्रकरण थोड विचित्रच वाटलं. सहसा अवनी अस कधी वागायची नाही. हा थोड़ी हट्टी होती, ती तर सगळीच मुलं ह्या वयात असतात पण इतरांप्रमाणे अवनी कधी आततायीपणा करायची नाही. आईविना पोर म्हणून ती तिच्या आजीची ज़रा जास्तच लाडकी होती एव्हढंच. पण बाक़ी अवनी होती अगदी गोड आणि लाघवी. पूर्वी दंगा करून घर डोक्यावर घेणारी अवनी मम्मा गेल्यापासून मात्र थोडी बदलली होती. एकेवेळची बडबडी मस्तीखोर अवनी आता बरीचशी शांत आणि खुपशी समजंस झाली होती. कधी कधी असा अवेळी आलेला पोरकेपणा लहान वयात मुलांना उगाचच मोठं करून टाकतो असाच काहीसा प्रकार अवनीच्या बाबतीतही झाला होता. त्यामुळेच की काय आजचा हा प्रकार ज्योतीला ज़रा खटकला आणि तिने तो लगोलग देवघरात पोथी वाचत बसलेल्या आजीच्या कानावर घातला. नेमक काय झालं असावं हे जरी तिला माहीत नसलं तरी पोरीचं काहीतरी जबरदस्त बिनसलं आहे, हे त्या म्हातारीला जाणवलं होत. पण आज तर कधी नव्हे ती अवनी शाळेत जाताना खुप खुश दिसत होती. मग अस मध्येच काय झाल अचानक? काही कळत नव्हतं. आजी तडक अवनीच्या रूमकडे निघाली. अवनीने आतून दरवाजा बंद करून घेतला होता.

"अवनी बाळा काय झालं? दार उघड पाहू. हे बघ मी आलेय... आजी....अशी दार बंद करून का बसलीयस? तुला कुणी काही बोलल का?  काय झालं ते सांग तरी? तू पहील दार उघड पाहू"

दार ठोठावत आजी बोलत होती. पण दार उघडायला जस जसा वेळ लागत होता, तस तसा बाहेर उभ्या असलेल्या आजी आणि ज्योतीचा धीर खचत होता. आजी आता अवनी ला मोठ्यांनी हाका मारीत आपल्या कापर्या हातांनी जोरात दार वाजवत होती.

"अवनी बाळा दार उघड बाळा... काय झालय ते सांग तरी मला. तुला शप्पथ आहे माझी...."
"मी नाही बोलणार जा......"

आतून अवनीचा रडवेला आवाज आला. अवनी चा आवाज ऐकल्यावर दोघीनांही थोड हायसं वाटलं. आजीने पुन्हा एकदा दार वाजवलं.

      हा समजतो कोण स्वत:ला?. ह्याला काय एकट्यालाच काम आहेत? आणि एव्हढ कसलं काम करतो हा ऑफिसमध्ये ? आज माझ्या स्कूलमध्ये एन्युअल डे होता. मी काल रात्री त्याला बजावून सांगितलं होत की उद्या तुला यावचं लागेल म्हणून. ह्या वर्षी मी शाळेच्या नाटकांत सिंड्रेलाचं काम करतेय हे ही माहिती होत त्याला. एव्हढ सांगुन सुध्दा आज तो आला नाही. सगळ्यांच्या घरातून कोण ना कोणतरी आले होते. जेनिताचे तर मम्मा, पप्पा आणि दादापण आला होता.फ़क्त माझ्या एकटीचेच कुणी नव्हतं तिथे. आजीला तर माझ्या बेडरुमपर्यंत पण येता येत नाही. गुडघे दुखतात हल्ली तिचे फार. त्यादिवशी डॉक्टरकाका पण घरी येउन गेले. आता आजी घरी एकटी आहे म्हटल्यावर ज्योती तरी कशी येणार? आज मम्मा असती तर, ती नक्की आली असती. माझ्या एंट्रीला सगळ्यां सोबत तिनेही टाळ्या वाजवल्या असत्या. तश्या एंट्रीला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पण त्या त्यांनी सिंड्रेला स्टेजवर आली म्हणुन वाजवल्या. त्यात एकही टाळी माझ्यासाठी नव्हती. पण ती आता देवाबाप्पाकडे कायमची रहायला गेलीय म्हटल्यावर आता मी तरी काय बोलणार? आज येऊ दे तर त्याला घरी मग बघतेच कशी? आज तर मी त्याला सरळ सांगणारच आहे की, सोडुन दे ही असली घाणेरडी नोकरी. काय कामाची आहे. कधी बघावं तेव्हा नुसत काम नी काम. सकाळी सकाळी सगळे उठायच्या अगोदर निघून जातोस ते डायरेक्ट मध्यरात्री उगवतोस. वर जाताना कुणाला सांगत ही नाहीस. आजीला नाही तर नाही निदान मला तरी उठवत जा ना!!! आता मी मोठी झालीय रे. आता मला चहा ही बनवता येतो. ज्योतीने शिकवलाय मला चहा बनवायला. अगदी तुला आवडतो ना तसा. आलं टाकलेला. तू पण ना ग्रेट आहेस. चहात काय काय टाकुन पितोस? त्यादिवशी आजी सांगत होती तुझ्याबद्दल की एकदा तुला आलं टाकलेला चहाचं हवा होता. आणि घरात आलंच नव्हतं. तर तू हट्टाने तिला चहात आल-लसणाची पेस्ट टाकायला लावली होतीस म्हणे. अन मोठ्या चवीने चांगले दोन कप चहा प्यायला होतास. हे सांगताना तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. मी बघतेय पाहिल्यावर तिने ते अलगद पुसून घेतलं. तिला वाटलं की मला कळलं नाही, पण मला बरोबर माहिती आहे की ती का रडत होती ते ? हल्ली तू बदलला आहेस हे माझ्याप्रमाणे तिला ही जाणवलं आहे ते, पण ती ते बोलून नाही दाखवत. पण खरच तू खुप बदलला आहेस. पूर्वी कस सगळ छान छान होत. आपण सगळे किती मस्त मज्जा करायचो. मी आणि तू सकाळी एकत्रच निघायचो. मी शाळेत जायची आणि तू ऑफिसला. फार मज्जा यायची तुझ्या गर्लफ़्रेंडसोबत शाळेत जायला. तू तुझ्या बाईकला गर्लफ़्रेंड म्हणतोस हे माझ्या मैत्रिणिंना सांगितल्यावर त्या किती हसत होत्या माहितीय?  दुपारी तूला प्रोमीस केल्याप्रमाणे मी सगळा होमवर्क पूर्ण करुन ठेवायचे. संध्याकाळी तू आलास की मग खरी मज्जा यायची. काय मस्ती करायचो आपण तेव्हा. ज्योती आणि आजी दोघीही अगदी हैराण व्हायच्या. रात्री झोपायच्या वेळेस तुझ्या मांडिवर डोक ठेवल्यावर तू माझ्या केसांतुन हात फ़िरवत असताना गाणं गायचास. मला तेव्हा कळायचं नाही कुठलं म्हणायचास ते, पण ऐकायला मस्त वाटायचं. तुझ गाणं ऐकता ऐकता झोप कधी लागायची ते कळायचंच नाही. मला नाही वाटत की, आपली कुठली सुट्टी घरात गेली असेल. दर विकेंडला आपण कुठेतरी बाहेर फिरायला जायचो. तुला समुद्र फार आवडायचा. कारण महिन्यातून निदान दोनदा तरी आपण समुद्रावर जायचोच जायचो. ए..मम्मा तुला इथे समुद्राच्या किनारीच पहिल्यांदा भेटली होती ना रे?  म्हणुन तू इथे मला घेउन येतोस ना सारखा सारखा. मला माहितीय तुला मम्माची फार आठवण येते ती. मला ही येते कधीकधी. पण मला मम्मा निटशी आठवत नाही. मी तिचे फ़ोटो पाहिलेत आपल्या जुन्या कपाटातल्या अल्बममध्ये. मुन्ना मावशी म्हणते की मी अगदी मम्मासारखी दिसते म्हणुन. हो....का रे?
      जाऊ दे तुला विचारण्यात आता काही फ़ायदा नाही. तू काय सांगणार? हल्ली तुला माझ्याशी बोलायला तरी वेळ आहे का? आज काय तर म्हणे कसलीतरी मिटिंग आहे रात्री घरी यायला उशीर होईल, उद्या काय तर म्हणे मी चार दिवसासाठी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी चाललोय. मला एक कळत नाही जर का माझा फोन ही उचलायला तुझ्याकडे वेळ नाहीय, तर मग हे सगळं आजीला सांगायला तुला बरा वेळ मिळतो? बरोबर आहे....आजी बिचारी भोळी आहे तिला शेंडी लावायला सोप्प आहे. माझ्यासमोर तुझी कुठलीही कारण चालणार नाहीत हे पक्क ठावुक आहे तुला. म्हणुन आजकाल तू माझे फोन ही घेत नाहीस? मला कळतय की तुझ ऑफिसला जाण माझ्या शाळेत जाण्याइतकच गरजेच आहे, पण आम्हाला निदान रविवारची तरी एक सुट्टी देतात तुला तर तेव्हढीही नाही देत का रे? की तू मुद्दामून घेत नाहीस? ऑफिस इतकीच तुझी अजुन कुणाला तरी तितकीच जास्त गरज आहे हे तुला कळत कस नाही? आणि रात्री नक्की येतोस किती वाजता तू? काल रात्री बाहेर कसला तरी आवाज झाला म्हणून खिडकीत आले बघायला तर तुला अंगणात खाली एकटाच फिरताना पाहिलं. बापरे!!!!!काय अवस्था करून घेतलियस स्वत:ची?? एकतर जवळपास महिन्याभरानंतर तुला पहात होते आणि तेहि अश्या हालत मध्ये. आजकाल ऑफीसमध्ये फार काम असत का रे तुला? फार दमलेला दिसत होतास. पूर्वी कसा नेहमी मस्त रहायचास. ऑफिसवरुन आलास की सगळ्यांत पहिल्यांदा मला शोधायचास. आता तुला पाहिल तर तू स्वत:च कुठेतरी हरवल्यासारखा दिसत होतास. मी तुला हाक मारली. पण तुझ लक्ष्यच नव्हतं. चांगल्या दोन तीन हाका मारल्यावर एकदा कुठे तू माझ्याकडे पाहिलसं आणि साधं हसला पण नाहीस. थोडावेळ थांबुन मग मी ही पुन्हा झोपायला निघून आले. मध्येच कसली तरी चाहुल लागली तर तू होतास माझ्या बेड शेजारी. तुला पाहून किती बरं वाटलं माहितीय. तुला आठवतं माझी एक बाहुली होती ती. अरे ती नाही का? जी हरवल्यावर मी पुर्ण दिवस जेवले नव्हते. किती कासावीस झाला होतास तु. एक दिवस सुट्टी घेउन तू ती बाहुली घरात शोधत होतास. अन एक दिवस अचानक कपाट साफ करताना ती सापडल्यावर तेव्हा जस मला वाटलं होत ना अगदी तस्सच त्या रात्री तुला पाहुन मला वाटलं. मी तडक उठून बसले. तू माझ्याकडे पाहून हसलास... नेहमीसारखा. मघाशी मला वाटलेल की, तु माझ्यावर रागावला बिगवला आहेस की काय? पण तस काही नाही, हे पाहून जीवात जीव आला माझ्या. मी तुला मिठी मारली. आई ग!!! अरे बाहेर फिरताना स्वेटर तरी घालायचस. कसला गारठला होतास. एकदम बर्फासारखा.पण तू कधी कुणाच ऐकशील तर खरं. मग पुढची रात्र तुला इतक्या दिवसाच्या गमती सांगण्यातच संपली. पुन्हा तुझ्या मांडीवर डोक ठेवून पुर्वीसारखी झोपले. इतके दिवस फ़क्त डोळे मिटुन पडून रहायचे तुझी वाट बघत पण झोप काही यायची नाही. मग ना मी तुझे नी माझे पूर्वीचे दिवस आठवायचे. माझा बर्थ डे, आपली पिकनिक, आपण आजीच्या वाढदिवसाला तिच्यासाठी बनवलेला सरप्राईज केक अश्या कितीतरी गोष्टी. मग उशिरा कधीतरी डोळ्यांसमोर गडद काळोख व्हायचा आणि सगळं शांत व्हायचं. पण आज ह्या कश्याचीच गरज नव्हती. मस्त झोप लागली. सकाळी उठून पाहिलं तर तू नेहमीप्रमाणे कुणालाही न सांगता निघून गेला होतास. मी सगळीकडे शोधलं तुला तू नव्हतास कुठे. आजी देवघरांत पोथी वाचत होती. आजी नेहमी त्या पुस्तकातलं वाचुन, एव्हढ काय त्या देवाला सांगत असते हे त्या देवालाच ठावुक. ज्योतीला विचारून काही उपयोग नव्हता. पण आज सकाळी मला फार मस्त वाटत होत. एकतर आज माझा अन्युअल डे होता. त्यात पुन्हा मी नाटकात सिन्ड्रेलाच काम करणार होती. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तू आज माझ्या शाळेत यायच प्रोमीस केल होतस. मी पुर्ण दिवसभर तुझी वाट पहात होते.पण तू नाही आलास. शेवटी शेवटी तर नाटकातले बरेचसे संवाद मी होलच्या मेन दरवाज्याकडे बघूनच म्हटले. पण तू नाही आलास. मला वाटलेल की निदान बक्षिस समारंभाच्या वेळीस तरी तू येशील, पण तु..........
      अवनीला समोरची खिडकी आता धूसर दिसू लागली. तिला आता ह्या घडीला अगदी एकट एकट फिल येत होता. तेव्हढ्यात जोरजोरात दार वाजवायच्या आवाजाने अवनी भानावर आली. सोबत आजीची हाक ही ऐकू येत होती. खरतर तिला ह्या क्षणाला कुणाशी काहीही बोलायच नव्हतं. पण शेवटी आजीचा आवाज ऐकल्यावर तिच तिलाच रहावल नाही. तिने दरवाजा उघडला आणि दारातच आजीला मिठी मारून तिच्या कुशीत हमसून हमसून रडू लागली. अवनीला सुखरूप पाहून आजीला हायसं वाटलं पण तिला अस रडताना पाहून ती एकदम काळजीत पडली.

"अवनी बाळा काय झालं इतक रडायला?. ए सोनू सांग ना...."
" मी नाही बोलणार आता कधी त्याच्याशी. तो खुप वाईट आहे."  एव्हढ बोलून अवनी पुन्हा रडायला लागली.
"अग पण कोण????? आणि कुणाशी नाही बोलणार आहेस तू?"
"पप्पाशी......."
अवनीने अस म्हणताच त्या दोघीहीजणी एकामेकांच्या तोंडाकडे पाहू लागल्या. ज्योती काही बोलणार तेव्हढ्यात आजीने तिला अवनीसाठी पाणी आणायला पाठवले. ती गेल्यागेल्या अवनीला समोर उभ करून आजी म्हणाली "अवनी शांत हो पाहू आधी आणि मला नीट सांग नक्की काय झाल ते."
आजीने अस विचारल्यावर अवनीने काल रात्रीपासून घडलेला प्रकार आजीला सांगितला " सांग ना आजी अस का करतोय तो? त्याला कळत नाही आहे का की, मला किती त्रास होतोय त्याच्या अश्या वागण्याचा ते? का लांब लांब रहातो माझ्यापासून तो हल्ली?  सगळ्यांकडे त्यांचे त्यांचे मम्मा पप्पा आहेत. माझ्याकडे फ़क्त तोच आहे आणि आता तो पण असा मला टाळतोय. हल्ली तो मला कधी भेटत नाही माझा फोनही घेत नाही. तो फ़क्त तुझ्याशीच काय तो बोलतो. फ़ोनपण तुलाच करतो. आज रात्री येउच दे त्याला. मी त्याला सरळच सांगणार आहे की, त्याला जर का माझा एव्हढाच कंटाळा आलाय तर मग मी माझ्या मम्माकडेच जाते कशी?"
अवनीने अस बोलताच आजीने अवनीला छातीशी घट्ट धरून घेतलं आणि रडायला लागली.
" नको ग अशी बोलूस राणी. तुझ्याशिवाय माझ दुसर आहे तरी कोण? मी बोलते तुझ्या पप्पाशी. माझ्या इवल्याश्या पोरीला रडवतो म्हणजे काय? थांब चांगली खडसावतेच त्याला. पण तू कुठेही जाऊ नकोस. नाही ना जाणार??"
"खरच?????बोलशील तू त्याला?"
"हो...पण एका अटिवर ह्यापुढे कधीही मला सोडुन जायच्या गोष्टी मनातसुध्दा नाही आणायच्या. शपथ घे माझी" हे बोलताना आजीचा केविलवाणा झालेला आवाज अवनीला जाणवला.
“तुझी शपथ... मी तुला आणि पप्पाला सोडुन कुठेही नाही जाणार”
एव्हढ बोलुन अवनीने आजीला गच्च मिठी मारली. दोघीजणी एकामेकांना घट्ट धरून बसल्या होत्या. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. रुममध्ये एक प्रकारची उदासी पसरली होती. अवनीच्या प्रश्नांनी आजीच्या डोक्यात विचारांच काहुर माजलं होतं
"अग मी काय समजावणार त्याला? आणि कसं समजावणार त्याला? तुला वाटतं तितकं सोपं नाही ते बाळा. तो आता माझ्या ऐकण्यातला राहिलेला नाही. तू बरोबर बोललीस तो लांब गेलाय ...आपल्यापासून खुप लांब. कधीही परत न येण्यासाठी. त्या दिवशी तुला शाळेत सोडायला गेला तो परत आलाच नाही. बराच वेळ झाला तो आला नाही म्हणुन त्याचा फोन लावला. तर खुप वेळानंतर समोरून फोन कुणितरी उचलला, तो तुझा पप्पा गेला हा निरोप देण्यासाठी. तुझा त्याच्यावरचा राग सहाजिकच आहे. पण त्यात त्याची काही चुक नाही ग बाळा. चुक कुणाची असेल तर तर ती माझी आहे जिने तुला तो फ़ोनवरचा निरोप आजवर दिलेला नाही. कसा देऊ? हिम्मतच होत नाही. तुझी मम्मा गेली तेव्हा तुला जो धक्का बसला त्यातून तू आताशी कुठे सावरत होतीस. डॉक्टरांनी त्यावेळेसच तुझी नाजुक परिस्थीती पाहून ह्यापुढे तुला कुठलाही मानसीक आघात सहन होणार नाही अस सांगितलेले. त्या दिवसापासून तुझ्या पप्पाने तुला अतिशय फ़ुलासारखं सांभाळल. तुला कधी मम्माची कमी जाणवेल अशी परिस्थीतीच येउ दिली नाही. तुझ्या पप्पासोबत तो तुझी मम्मादेखिल झाला. पण आज एव्हढि मोठी जबाबदारी माझ्या अंगावर टाकुन तो निघून गेलाय. तो आता आपल्यात नाही ही गोष्ट मला ही सहन होत नाहीय. तुझ्या त्याच्याबद्दलाच्या प्रश्नांची खोटी उत्तरं देताना माझी फार दमछाक होतेय ग राणी. मला नाही झेपत हे सारं आता ह्या वयात. अचानक काही न कळवता चालता बोलता निघून गेलास, तसाच एक दिवस परत निघून ये आणि सोडव मला ह्यातुन. आता तूच सांग हे सगळं मी कस समजावू त्याला?" आजीला आता स्वत:च स्वत:ला आवरणं कठिण होत होतं.
       तेव्हढ्यात ज्योती पाणी घेउन आली. तिच्या येण्याने भानावर आलेल्या आजीने आपले अश्रु आवरते घेतले. "चल बाळा बराच वेळ झाला. आता दोन घास जेवून घे बघू. ज्योती तू अवनी घेउन जा खाली आणि पानं वाढायला घे. मी येते हळुहळु मागुन. बराच वेळ झाला माझी पोर उपाशी आहे. अगं लहान मुलांना अस फार वेळ उपाशी ठेवु नये. नाहीतर त्यांची आजी लवकर म्हातारी होते."आजीने अस म्हणताच अवनी खुदकन हसली. तिला अस नॉर्मल झालेली पाहून आजीलाही बरं वाटलं. अवनी ज्योतीसोबत दारापर्यंतच गेली असेल की काहीतरी आठवुन गरकन मागे वळली आणि आजीकडे येउन म्हणाली."आजी तू आज बोलशील ना त्याला? पण जास्त ओरडु नकोस हा त्या बिचार्याला. खरच त्याला ऑफिसमध्ये खुप काम असणार, नाहीतर तो अस कधी करणार नाही. त्याला सांग तो कामात एव्हढा बिझी आहे ना, तर ठीक आहे. मी नाही त्रास देणार त्याला. पण जेव्हा कधी त्याला वेळ मिळेल ना तेव्हा मला दिवसातुन एकदातरी भेट किंवा नुसता एक फोन कर म्हणावं. ते देखिल चालेल मला. नक्की सांगशील ना???"  आजीने फ़क्त मान डोलावली. अवनी खुश होउन रूमच्या बाहेर पळाली.
दाराकडे पहात असताना आजीच लक्ष्य दरवाजाच्या बाजुच्या भिंतीवर लावलेल्या त्याच्या फ़ोटोवर गेल "किती गोड हसायचा तो. देवाचा पण ना कधी कधी खुप राग येतो. त्याच गणितच मला कळत नाही. माझी सोन्यासारखी लेकर माझ्या डोळ्यादेखत माझ्यापासून हिरावून घेताना त्या देवाला काहीच कस वाटल नाही. माझा नाही तर निदान त्या इवल्याश्या जीवाचा तरी विचार करायचा. पण एक कळत नाही अवनी काल रात्री तो तिला भेटला होता अस का म्हणाली? खरच का तो तिला भेटायला इथे परत आला असेल? असेल ही फार जीव होता त्याचा तिच्यावर.पण अवनी सांगते त्याप्रमाणे हे जर का खर असेल तर तू पुन्हा आलास ना की एक काम कर फ़क्त एकदा आणि फ़क्त एकदाच तुझ्या या आईलाही भेट. फार आठवण येते रे तुझी. तुझा जसा अवनीमध्ये जीव अडकलाय ना.. तसाच माझाही तुझ्यासाठी जीव तुटतोय रे... ह्या म्हातारीच एव्हढ काम करशील ना"  आजी विचारात गढलेली असताना तेव्हढ्यातच अवनीची खालून हाक ऐकू आली " आज्जी.... येतेयस ना??? मी केव्हाची थांबलेय तुझ्यासाठी"
"आले आले... अगं तुझ्या पप्पालाच फोन लावत होते. पण हा कधी फोन उचलेल तर शपथ. कधी बघावं तेव्हा नुसत कामातच असतो.काय करायच ह्याच काही कळत नाही.आज ज़रा का तो वेळेवर घरी आला नाही ना.., तर मी पण त्याच्याशी या पुढे कधी बोलणार नाही....." त्याच्या फ़ोटोकडे एकवार डोळे भरुन पहात गळ्यात अडकलेला हुंदका कष्टाने पोटात ढकलत, जडावलेल्या पायांनी, मोठमोठ्याने बडबडत ती जिन्याच्या दिशेने चालु लागली.

भूक

गारपिटीचा मारा असह्यच होता. उभं पीक जेमतेम १० मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे आडवं झालं होतं. गुडघ्यात डोके घालून धर्मा शेताकडे तासन्तास बघत राही. कर्जाच्या डोंगराखालि दबून गेलेला धर्मा आताशी कुठे वर यायची स्वप्ने बघू लागला होता. आणि या आक्रिताने त्या स्वप्नांची धूळधाण उडवली होती.
गारपीटग्रस्तांना मदत घोषित झाल्यावर धर्माला आशेचा किरण दिसला. आमदारसाहेबांनी स्वतः गावात येऊन २ शेतकर्‍यांना मदतीचे चेक स्वहस्ते दिले. मामलेदार कचेरीत जाऊन आता फक्त चेक घेऊन आले की आपल्याला कसलीच काळजी राहणार नाही अशी त्याची खात्रीच पटली.
पहिल्या खेपेला बँकेने दादच लागू दिली नाही. पूर्ण दिवस तिथे बसून काढल्यावर अखेर हात हलवत परत यावे लागले. आणखी तीन वेळा असेच घडल्यावर घरी बायको अन पोरे हवालदिल झाली. आता खायचे अन्न संपत आले. २ दिवस उपाशी राहून अखेर तिरीमिरीत धर्मा पुन्हा तालुक्याला गेला आणि पुन्हा एकदा त्याला वाटाण्याच्या अक्षता लागल्या.
एसटी स्टँडला थांबली तसा कंडक्टर धर्माकडे बघत-न-बघतच तिरसट आरोळी ठोकली, "विश्रामपूर आलंय, उतरा की आता" अर्धवट बंद डोळ्यांची उघडझाप करत धर्मा कसाबसा उठला. पायात मुळीच त्राण नव्हते. तसाच धडपडत एस्टीतुन बाहेर पडला आणि जेमतेम १०*१० च्या 'स्टँड' कडे जायला निघाला.
स्टँड्मध्ये शिरल्याशिरल्या जवळच्या एकमेव बाकड्यावर धर्माने अंग टाकले. पोटात आता फक्त एक खड्डा जाणवत होता, बाकी सगळ्या संवेदना बधिर होत चालल्या होत्या. त्याच्या डोळ्यांसमोर संपूर्णपणे अंधार होता. एव्हढ्यात त्याच्या कानावर एक आवाज पडला,"रातिवड्याचं पाव्हनं न्हवं का तुम्ही?".
धर्माने कसेबसे डोळे उघडून पाहिले, तर एक शेतकरी त्याच्याकडे निरखून बघत होता.
"व्हय" धर्माने अस्पष्टसे उत्तर दिले. त्याच्या आवाजावरूनच पाव्हण्याला एकंदर परिस्थितीचा अंदाज आला. त्याने आपल्या हातातले पुडके पुढे केले.
"पारंच गळाटला की पाव्हनं...... घ्या वाईच भेळ खावा".
पोट आणि मेंदूनेही धर्माला 'नको' म्हणायची परवानगी नाकारली. तशीच मळकट मूठ त्या कागदी पुडक्यात बुचकाळत त्याने अधाशासारखे बकाणे भरायला सुरुवात केली. त्याचा आवेग पाहून पाहुणाही थक्क झाला.
पहिला घास पोटात गेल्यावर एका कोरड्या शेतातल्या खड्ड्यात पाण्याचा हंडा ओतल्यासारखे धर्माला वाटले. त्या समाधानाला शांतपणे अनुभवावे असाही त्याच्या डोक्यात विचार आला. पण नकळतच त्याचा हात पुन्हा एक मूठभर भेळ घेऊन तोंडाकडे आला होता. त्यामुळे खाण्यातील समाधान शोधण्यापेक्षा आधी त्याची गरज संपवणे इष्ट होते. त्याने गचागच घास तोंडात भरायला सुरुवात केली.
भेळेचा अर्ध्याहून जास्त पुडा फस्त केल्यावर मेंदू जागा झाला आणि धर्मा थोडा मागे सरकला. इतका वेळ भुताकडे पाहिल्याप्रमाणे त्याच्याकडे बघणारा पाव्ह्णा एकदम भानावर आला आणि हातातली पाण्याची अर्धवट काळी बाटली धर्माला देत म्हणाला, "लैच भुकेले होता जनू!!!!! कुठुन आलासा?"
"मामलेदार कचेरीकडून" पाण्याचे दोन घोट पीत धर्मा उत्तरला.
"चेक आनायला गेलता का?" पाव्हण्याने कुत्सित हसत विचारले.
"व्हय. तुमी कुटले?"
"मी बाभुळवाडीचा.......खैरनार......"
धर्माच्या डोक्यात काही ट्युब पेटेना. बाभुळवाडी खरं तर त्याच्या गावावरून जवळच. पण त्याला कोणी खैरनार आठवेना. तेव्हढ्यात पाव्हण्याने विचारले,
"किती शेती म्हनायची तुमची?"
"नावाची शेती. जिवावर उठलिया माझ्याच. एक साल काही नीट जाईना" धर्मा उद्विग्न होऊन म्हणाला.
"असं म्हणून चालतया व्हय? अवो, कितीही झालं तरी पोटाला देतीया ती."
खैरनाराच्या वाक्याने धर्माला हसू फुटले. त्याची जमीन निदान त्याच्या पोटाला तरी देत नव्हती हे नक्की.
"आता कसं करनार मंग?" खैरनाराच्या प्रश्नाने धर्मा भानावर आला. त्याच्या मनात पुन्हा काळजीचे ढग जमा होऊ लागले. आजची आपली व्यवस्था तर झाली पण पोराबाळांचे काय? घरातला दाणापाणी कधीच संपला होता. उधार तरी कोण आणि किती दिवस देणार? भुकेने रडणार्‍या पोरांचे चेहरे त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागले. त्याच्यापुढचा कोणताच मार्ग त्याला दिसत नव्हता.
त्याची मनस्थिती खैरनारने बरोबर ओळखली.
"असं करा. बाभूळवाडीला खाशाप्पांच्या घरला या उद्या. काहीतरी सोय करूयात"
खैरनाराच्या उद्गाराने आपल्याला देव तर भेटला नाही ना असेच धर्माला वाटले. अशा उद्गारांची त्याला सवय नव्हती. मदतीसाठी लाचार होऊन दारोदार पायताणं झिजवायची धर्माला आता सवय झाली होती, मात्र मदत स्वतःच अशी आपल्यासमोर येईल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.
"...............पन पाव्हनं, कागुद करावा लागंल" उरलेल्या भेळेतले शेंगदाणे शोधत शांतपणे खैरनार म्हणाला.
धर्मा खाडकन भानावर आला. क्षणार्धात त्याला खैरनार आणि खाशाप्पांची जोडी लक्षात आली. उरलेसुरले अवसान गोळा करून तो उभा राहिला.
"व्याज किती?"
"१५ टक्के आणि ते व्याजावर चढनार बरं का"
व्याजावर चढणार याचा अर्थ चक्रवाढ हे धर्माच्या लक्षात आले. त्याच्या जन्मात तो ते फेडू शकणार नाही हेदेखील तिथल्यातिथे त्याच्या लक्षात आले.
"ते न्हाई जमायचं" त्याच्या तोंडून ठामपणे उद्गार बाहेर पडले.
खैरनाराने त्याच्याकडे नजर वळवली. त्याच्या चेहर्‍यावरचा मैत्रीचा भाव कुठल्याकुठे गेला होता. थंड डोळे धर्मावर रोखुन अत्यंत कोरड्या आवाजात तो म्हणाला,
"बस खाली............. आरं, पोट भरल्यावर अभिमानानं बोलायचं असतया. तुला मी हिथं भेटलो नसतो तर भुकेपायी मेला असतास अन उद्या तुझ्या बायकोला पंचनाम्याला पोलिस हिथं घेऊन आले असते. लेका जगायची ऐपत न्हाई तुझी आणि जमिनिवर कसलं प्रेम करतुयास? एकदा आलेली लक्श्मी अशी धुडकारशील तर पुन्हा उभं न्हाई करणार ती तुला...... असंच करीत र्‍हाईलास तर सरकारच एक दिवस शेत जप्त करंल. सावकार शेत करू तरी देतो का न्हाई? "
दुसरा भेळेचा पुडा तिथेच ठेवत खैरनार उठला.
"हे पोराबाळास्नी घेऊन जा. भुकेले असतील. तु लेका बिनधास्त हाणंलस. त्यांची काळजी हाये आमच्या सावकारास्नी........."
धीमी धीमी पावले टाकत खैरनार अंधारात नाहीसा झाला. बाकड्यावरच्या भेळेच्या पुड्याकडे धर्मा विषण्ण्पणे बघत राहिला आणि अखेर त्याने तो पुडा उचलला.................

Tuesday 1 July 2014

लव्ह - ट्रँगल.......नक्की वाचा …………….

रिचाचं आणि माझं तसं सारं व्यवस्थित चाललं होतं, रिचा दिवसातला बराच वेळ मला देत असे. त्या व्यतिरिक्त नित्यनियमाने फोनवर बोलणे होत असे . कधी ती फोन करत असे तर कधी मी. पण गेल्या जवळ जवळ वर्षभरात हे चित्र बदललं होतं.आता फक्त मीच फोन करत होतो. आणि पूर्वी तासन तास फोन वर बोलणारी रिचा मात्र फोन उचलल्या पासून "ठेवू का?" चा घोष लावत असे.
आजसुद्धा तिच्या फोनची वाट पाहून शेवटी मीच तिला फोन लावला. तिने फोन उचलला, पण पहिलेच वाक्य -"अरे जरा बिझी आहे, नंतर बोलूया का?" मी विचारले "कुणी बरोबर आहे का?" "हो, राकेश आहे. मी तुला नंतर फोन करेन." असे म्हणून मी पुढे काही बोलायच्या आत तिने फोन ठेवला. "राकेश!!" मी काहीसं चिडूनच फोन खाली ठेवला. आजकाल जवळ जवळ सारा वेळ रिचा राकेशबरोबर घालवू लागली होती. रिचा आणि माझ्यामध्ये राकेश कडमडला होता. पूर्वी आतुरतेने आणि तत्परतेने उचलले जाणारे माझे फोन कॉल्स आता मिस्ड कॉल्स मध्ये जमा होऊ लागलं होतं. रिचाचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे याची मला एके काळ खात्री होती. पण आता त्या प्रेम कहाणीचं रुपांतर लव्ह ट्रायंगल मध्ये रुपांतर झाल्याची चिन्हे दिसू लागली होती.
रिचाचं आणि माझं बोलणं बरेचसे जुजबी होऊ लागलं होतं.थोडं फार बोलणं होई त्यात ती राकेश बद्दल जास्त बोलू लागली होती.इतके दिवस ती कायम माझे कौतुक करत असे. पण आता राकेशचे कौतुक होऊ लागलं होतं.रिचाचं माझ्याकडे होणारे दुर्लक्ष मला बरेच जाणवू लागलं होतं.
कालचाच प्रसंग. आज (म्हणजे काल रात्री १२ वाजल्यापासुन) माझा वाढदिवस. आमची ओळख झाल्यापासून रिचाने कधी माझा वाढदिवस चुकवला नव्हता. सर्वात आधी शुभेच्छा, ते सुद्धा आदल्या रात्री बरोबर १२ च्या ठोक्याला रिचा देत असे.आणि दुसर्‍या दिवशी जंगी पार्टीचं प्लानिंग सुद्धा तीच करत असे. पण काल रात्री मात्र रिचाकडून शुभेच्छा मिळाल्या नाही. कदाचित ती बिझी असल्याने विसरली असेल अशी मी मनाची समजूत घातली.कदाचित तिला सकाळी आठवेल आणि ती सकाळी मला शुभेछा देण्यासाठी ऑफिसमध्ये फोन करेल आणि काल रात्री शुभेच्छा द्यायला विसरल्याबद्दल माझी माफी मागेल, असं मी स्वतःला समजावलं. पण सकाळ संपली दुपार होऊन गेली, संध्याकाळची चाहुल लागली तरी तिचा ऑफिसमध्ये फोन काही आला नाही. आता मात्र मी पुरता वैतागलो. मनाशी चरफडलो. तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. पाहतो तर की, चक्क रिचाचा फोन. एका क्षणात माझा सारा राग,वैताग नाहीसा झाला. रिचाबद्दल आतापर्यंत मी काय काय विचार केले ते आठवून स्वतःची लाज वाटली.
"बोल", मी माझी उत्सुकता माझ्या आवाजात दिसू न देण्याचा प्रयत्न करत होतो.
तिच्या मधुर आवाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐकण्यासाठी माझे कान पुरते आतुरले होते.
"जतीन, वाढदिवसाचा काय प्लान?", मला आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी रिचाने सरळ मुद्द्याला हात घातला हे पाहुन मी चक्रावलो.
"काय म्हणजे? जाऊ की मंत्रामध्ये नेहमीप्रमाणे.” मी माझ्या आवडत्या हॉटेलचं नाव सुचवलं.
"हॉटेल मध्ये कशाला? काही तरी वेगळं प्लान करू. हा वाढदिवस राकेशसाठी स्पेशल आहे!!"
माझ्या कानाला काही तरी खटकलं.
"वाढदिवस राकेशसाठी स्पेशल? तू नक्की माझ्या वाढदिवसाबद्दल म्हणतेयस की… ?" पटकन माझ्या तोंडून निघालं.
"अरे मी तुझ्या नाही, राकेशच्या वाढदिवसा बद्दल बोलते आहे " रिचा हे बोलली खरी आणि त्याच वेळी तिच्या डोक्यात १०० वॅट्सचा उजेड पडला. "ओ माय गॉड , जतीन आज तुझा वाढदिवस आहे आणि मी चक्क विसरले. आय एम सो सॉरी." रिचा आणखी बराच काही पुढे बोलली, पण मी ते ऐकत नव्हतो. ती माझा वाढदिवस विसरली हे जाणवून मी दुखावला गेलो होतो.
रिचाचं माझ्याकडे दुर्लक्ष होत होतं हे मला कळत होतं, पण आज त्याचा कळस झाला होता. तिच्याशी बोलायचं म्हणून काहीतरी बोलून मी फोन ठेवला.रिचाच्या आयुष्यात माझं महत्व आता कमी झालं होतं हे आता मला ढळढळीतपणे जाणवलं होतं. यातून कसा मार्ग काढायचा त्याचा विचार मी करू लागलो. लव्ह ट्रायांगल्स चित्रपटातच बरे, आयुष्यात ते परवडत नाही, हेच खरं. माझं डोकं पुरतं भणाणून गेलं, पण काय करावं ते सुचेना. दूर कुणाच्या तरी कॉम्प्युटरवर गाणं लागलं होतं .. क्या हुवा तेरा वादा..
माझं कामात लक्ष लागेना. कॉम्प्युटर लॉक केला.
कंपनी समोरच्या टपरी वर जाऊन सिगारेट घेतली. हवेत धूर सोडला. पण धुराची वलयं सुद्धा त्रिकोणी दिसू लागली. मनातच चरफडत सिगारेट पायाखाली चिरडली.
ऑफिसमध्ये परतलो. कसं बसं कामात गुंतवून घ्यायचा प्रयत्न केला. ७ वाजले. डेस्क आवरलं. कॉम्प्युटर बंद केला आणि ऑफिस्मधून बाहेर पडलो. ऑफिसच्या समोरच बस थांबा होता. तिथे आलो. नेहमीची बस पकडली. नेहमीप्रमाणे तासभर ट्राफिकमध्ये काढून ८ वाजता इमारतीच्या समोरच्या बस थांब्यावर उतरलो. विषण्ण मनाने जिन्याच्या पायऱ्या चढलो. बेल वाजवली. थोडा वेळ वाट पहिली, पण दार काही उघडलं नाही. ह्या वेळेला घरातले कुठे बाहेर गेले म्हणून चरफडत माझ्याकडची चावी शोधली आणि त्या चावीने दार उघडलं. संध्याकाळ झाल्यामुळे आत काळोख होता. दरवाज्याच्या बाजूच्या भिंतीवरचं दिव्याचं बटण शोधू लागलो. दिवा लावणार तेवढ्यात आपोआप घरातले सारे दिवे लागलं. आणि पाहतो तर काय घरात कोण जत्रा.. घरात माझे मित्र आणि माझे सारे नातेवाईक जमलेले. आणि साऱ्यांच्या पुढे माझी लाडकी पत्नी "रिचा" जी कधी नव्हे तो आज माझा वाढदिवस विसरली होती (असा माझा समज झाला होता) आणि तिच्या कडेवर आमच्या आगळ्या प्रेम त्रिकोणातला तिसरा कोन म्हणजे आमचा चिमुकला "राकेश". रिचाच्या माझ्यावरील प्रेमातला नवा भागीदार. पुढच्या आठवड्यात पठ्ठ्याचा पहिला वाढदिवस. त्याच्यासाठी, खरं तर आम्हा सर्वांसाठीच स्पेशल. मला पाहताच त्याच्या ओठांवर मिश्कील हसू आलं आणि तो माझ्या कडे झेपावला. सगळेच लव्ह ट्रायांगल्स काही वाईट नसतात, हेच खरं.
साऱ्यांनी एका सुरात "हॅप्पी बर्थडे - जतीन" चा घोष केला.
दूरवर कुठे तरी रेडिओवर प्रशांत दामले गात होतं "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते?"



नक्की वाचा …………….  

एक सॉरी.................





बसमधून उतरता उतरता तो बोलला.....
"सॉरी..माफ करा....जे काही झाले ते मुद्दाम नाही केले मी."
"सगळेच पुरुष सारखेच तुम्ही....बेशरम...बाई दिसले कि आले लांडगे धावत."
हे काल घडले.
"अहो सौभाग्यवती..लक्ष कुठे आहे तुमचे?इतक्या कुठे रमलात तुम्ही?"
"काही नाही हो....असंच....बसले होते शांत."
आता यांना कसे सांगू कि, माझ्या मनात काय चाललंय ते.समजून घेतील का ते?
'बायकोचा मित्र आणि नवऱ्याची मैत्रीण' हि दोन असून नसलेली नाती आहेत.ज्यांना कधीच समाज मान्य करत नाही.
समाजच काय तर...?आपणही कधी मान्य करत नाही...करणार नाही.
कालचा काल आपल्याला कालच विसरता का येत नाही? असा कसा पाठलाग करतो तो आपला?
काल तो भेटला....भेटला कसला?...दिसला...तो प्रसंग घडला...सॉरी बोलला नि गेला....
पण तो खरंच गेला कि अजून हि मागे तसाच बाकी आहे?
अनोळखी माणसं हि एकदम अचानक अशी ओळखीच्या माणसापेक्षा जास्त जवळची कशी वाटू लागतात?
जवळ जवळ बसूनही जवळ असतो का आपण?कि असेच दूर भटकत असतो आपण ?
एखाद्या प्रसंगातल्या काही क्षणांच्या भेटीमधले काही क्षण अख्या आयुष्यातल्या सर्व क्षणांवर अश्या कुरघोडी कशी करतात?
एखादी नवीन आवड आपल्या जुन्या आवडीला आपल्यापासून दूर करते का ?
एकाच वेळी दोन गोष्टी नाही आवडू शकत का माणसाला?
श्या....उगाच घडला कालचा प्रसंग.कोण तो?कुठुन आलेला..?माझ्याच समोर उभा का राहिला.?
वाऱ्याने माझाच पदर का उडवावा?उडवावा तो उडवावा...वर तेव्हाच त्याचे लक्ष माझ्याकडे का जावे?
चला गेलेच लक्ष...मला कळलेय कि तो बघतोय...हे कळल्यावर त्याने नजर हि फिरवली....
फिरवली तिथपर्यंत ठीक होते.पण माझा रागावलेला चेहरा बघून हि त्याने मला सॉरी बोलायची हिंमत दाखवावी???
आणि असा न आवडलेला प्रसंग असूनही तो विसरून न जाता मी तो सारखा सारखा का आठवावा?????
श्या.....झोप येणार कि नाही आज???अजितला कळले तर काय वाटेल त्याला?
आपल्या आवडत्या गोष्टीकडे आपले कितीही दुर्लक्ष झाले तरी चालते.....
पण आपल्या आवडत्या गोष्टीचे आपल्याकडे झालेले दुर्लक्ष आपल्याला कधी हि सहन होत नाही.
आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये आलेले भागीदार आपले मित्र बनणे कठीणच असते....बनलेच तर त्यात समजूतदारपणाचा खोटा आव आणावा लागतो.
एकदम लांबचे उदाहरण कशाला????
आपली बायको आपल्यापासून आपल्याच मुलामुळे लांब गेलीय हे पुरुष कसे सहन करतो हे त्याचे त्यालाच माहित.
माझे खूप प्रेम आहे अजितवर...तो हि खूप जपतो मला....
पण का माहित नाही बसमधला तो जो कुणी होता तो डोक्यातून जातच नाहीयेय माझ्या.उद्या पुन्हा दिसेल का तो??
उद्या नाही....नंतर कधी तरी दिसेल का?"
दोन-तीन दिवस तसेच गेले...पण अस्मीला तो काही दिसला नाही...पण तिसऱ्या दिवशी मात्र....
"तोच आहे का तो???होय...तोच...तोच आहे तो...तसा दिसायला ठिकठाक आहे....एकदमच काही बव्लात नाही दिसत...सर्वसाधारण दिसतो.
कपड्यावरून कमावत असेल चांगला असेही वाटतेय. असो ना? मला काय करायचंय?... त्यादिवशी खूप राग आला त्याचा...पण आज काहीच वाटत नाहीयेय.
बोलावसं वाटतंय त्याच्याशी...पण असं कसं बोलणार...अरे.....तो चक्क हसला माझ्याकडे बघून...तो हसला....पण मी हि का म्हणून त्याला हसून साद द्यावी?...हे काय होतंय मला..."
अस्मी मनातल्या मनात धावत होती...कारण माहित नव्हतं....थांबवता येत नव्हतं...
थोड्या दिवसांपूर्वी ज्याचा प्रचंड राग आला होता...आज त्याच्याच बाजूला अस्मी बसली होती.
पण दोघांमध्येही अंतर होते...त्या मधल्या अंतरात 'संस्कार' बसले होते....
"श्री....मला एक सांगशील...?
एखाद्या दिशेने धावत गेलं कि बाकीच्या दिशांकडे पाठ होते...पण दोन्ही दिशा हि जवळ हव्या असतील तर...?
दोन माणसं पुरतील इतकी जागा नसते का रे मनात ? कुणी दुसरा आवडला म्हणजे पहिल्यावर अन्याय केला असे असते का रे?
'लग्न झालं म्हणजे माणूस कधी पुन्हा प्रेमात पडूच शकत नाही' असे असते का? सांग ना रे श्री...
मी अजितला फसवतेय का रे...? पण आपण कधी आपली मर्यादा नाही सोडलीय...
सांग ना लवकर....बस येईल आता...पुन्ह हे सगळे विचारायला एकांत मिळेल कि नाही शंकाच आहे."
"सांग ना रे श्री...चुकतेय का मी...?"
"तू माझ्यासोबत येशील?? पळून जावूया का आपण? माझ्याकडे तिकीट पण आहेत बँगलोरची..."
"म्हणजे?"
"इतके कठीण वाक्य बोललो का मी? तुला प्रश्न नाही कळला? कि कळला पण ऐकलेल्यावर विश्वास नाही पटला"
अस्मी दचकली...अचानक घडले कि हे असंच होतं...रोजची हवा पण अनोळखी वाटू लागते.
"नाही येऊ शकत मी.माझे अजितवर खूप प्रेम आहे"
"आणि माझ्यावर?"
"माहित नाही..."
"छान.....प्रेम नाहीयेय मग तू इथे माझ्या बाजूला यावेळी का बसली आहेस?"
"माहित नाही...."
श्रीच्या डोळ्यांत पाणी होते...अन चेहऱ्यावर हसू होते...'कोल्ह्याचे लग्न' लागले होते...उन्हात पाऊस पडतो ना...अगदी तसे..
"अस्मी....तुझ्या या माहित नसण्यातच उत्तरं लपली आहेत.... तुझी पण आणि माझी पण...
तू हलके केलेस मला....तुझे उत्तर 'हो' असे असते ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो.
विचित्र होती ना आपली भेट?तुझा पदर ढळला होता..एक पुरुष म्हणून मी तिथे पाहिले....
तुझ्या ते लक्षात आल्यावर तू पदर ओढून घेतलास हि तुझी शालीनता होती.माझी चूक मला कळली नि मी नजर फिरवली हा माझा सभ्यपणा होता.
पण तरीही तुला सॉरी बोलावं असं मनापासून वाटलं मला.तुझ्या ढळत्या पदरापेक्षा तुझ्या सावरत्या पदरामुळे आवडलीस तू मला."
"श्री....रडू नको...माफ कर मला..."
"त्या दिवसापासून खूप स्वप्नं पाहीली मी तुझ्यासोबत...स्वप्नात तू दिसलीस पण नंतर नजर तुझ्या गळ्यातल्या मंगळसुत्रावर गेली....
आणि स्वप्नांचा बंगला पत्याच्या घरासारखा तुटला....आपलीच स्वप्नं कधीकधी आपल्या मालकीची नसतात.
एकवेळ अशी आली कि, वाटू लागलं....तुझा हात धरावा आणि पळून जावं.
मी विचार केला,वाटले कि.....तुझ्या आणि माझ्यामध्ये तुझे मंगळसूत्र येतंय....
पण नंतर कळलं कि, तुझ्या आणि तुझ्या मंगळसूत्राच्या मध्ये मी येतोय.
थोडा वेळ विचार केला,अजितच्या जागेवर उभं राहून पाहिलं...सहन नाही झालं...
संपूर्ण आयुष्यात माणूस खूप स्वप्नं बघतो, त्यातली काहीच स्वप्नं पूर्ण झालेली पाहण्याची संधी त्याला मिळते.
पण स्वतःच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या या स्वप्नांचा चुराडा झालेला कसा बघवेल त्याला..?
आयुष्यात इतकी माणसं येतात, पण एखादाच मनाला वेड लावतो.एखाद्यामुळेच आपल्याला जगणं आवश्यक वाटू लागतं.
आणि असा काळजाचा तुकडा आपण हिरावून न्यायचा....का? कशाला ?...कुणी हक्क दिलाय आपल्याला हे करायचा?"
"आता या क्षणी तुला खूप राग येत असेल ना रे अजितचा आणि माझा?"
"अस्मी या डोळ्यांत पाणी आहे...त्या पाण्याने तू मला अंधुक दिसतेयस...पण म्हणून या पाण्याचा राग कसा करू मी?
पाणी हि माझं आणि डोळ्यासमोरची तू हि माझी.....सॉरी....वाक्य चुकलं....माझी नाहीस तू...
हे मन किती विचित्र असतं ना अस्मी?
मला तू हवी आहेस...पण तुला माझं बनवताना मी दुसऱ्या कुणाचा तरी हक्क कसा हिरावून घेऊ?
तुझा हात माझ्या हाती यावा म्हणून मी दुसऱ्या कुणाचा हात मोकळा कसा करू ?
तू हवी आहेस मला..खूप खूप हवी आहेस...आकाशाकडे बघ किती जागा आहे????मोजता येतेय का? डोळ्यांत मावतंय का आकाश?इतकी हवी आहेस तू मला.
त्रास होतोय खूप....दूर सारताना तुला...पण तू माझ्या हक्काची नसताना हि मला इतका त्रास होऊ शकतो तर, तुला गमावल्यावर अजितचे काय होईल?
काय त्याची चूक....?इतकीच ना कि तो तुझ्यावर खूप प्रेम करतो????....
प्रेमाच्या बदल्यात प्रेम फार कमी वेळा मिळतं...तुला मिळालं हे तुझं भाग्य समज.
मनातल्या मनातच मनाची फुट पडली तर कुठे जायचं माणसाने?
एक मन सांगतंय कि, तुला घेऊन जावं कुठे तरी दूर....संसार थाटावा.पण तेच मन हेही सांगतंय कि,
'स्वत:च्या घरात तुळस लावण्यासाठी दुसऱ्याच्या वृंदावनातली माती काढायची नसते.
पावित्र्य देण्यात असतं, मिळवण्यात असतं...पण हिसकावण्यात नसतं.'
चल अस्मी. मी जातो.'येतो' असे नाही म्हणणार मी. कारण आता यापुढे मी तुझी आयुष्यात कधीच नाही येणार.
मी बँगलोरला जातोय..कायमचा ..एकटाच....मी एकच तिकीट काढले होते...
तू 'हा' बोलली असतीस तर माझी निवड चुकली असे समजून हरून गेलो असतो
आणि 'नाही' बोललीस तर निवड योग्य ठरली असे समजून जिंकून गेलो असतो...पण एकटाच गेलो असतो हे मात्र नक्की.....
प्रत्येक युद्धात ज्याची त्याची जिंकण्याची व्याख्या वेगळी असते.....
तू जिंकवलंस...मलाही आणि अजितला हि....बघ ना..अजित इथे नसूनही तू त्याची बाजू संभाळतेयस...त्याची बाजू लढवतेयस....
आपलं खरं अस्तित्व आपण नसताना असतं....
काळजी घे स्वत:ची आणि अजितची...तू दिलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मनापासून आभारी आहे..."

श्री जात होता....ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती.
श्रीने कमावलं कि गमावलं होतं? कि गमावून कमावलं होतं ? अस्मीचं पावित्र्य अस्मीकडेच शाबूत होतं कि नव्हतं?
अजित जिंकला होता कि हरला होता? श्री कुणाला जिंकवून गेला होता? स्वत:ला कि अजितला?
वादळ संपलं होतं का? कि अस्मिच्या मंगळसूत्राने ते जखडून ठेवलं होतं..?वादळ असं कधी बांधून ठेवता येतं का?
"आज उशीर झाला यायला तुला....?काम जास्त होते का ऑफिसमध्ये ?"
"हम्म....काम जास्त होतं."
अजित मनातल्या मनात म्हणाला,"हल्ली कामं बसस्टॉपवर करतात वाटतं..कोण असेल बरं तो?"

आठवण ..!!





तिने पुन्हा एकदा टेबल वरच्या डायरी मधला तो कागदाचा चिटोरा उचलला. परत त्यावरच्या नंबरवरून नजर फिरवली. पुन्हा टेबलवर ठेवलेल्या मोबाइल वर नजर खिळली, पुन्हा मन do or do not मध्ये अडकले. मनातल्या मनात पुन्हा येऊ शकणारे सगळे reactions तपासून पाहिले. नजर शून्यात लागलेली … आज सकाळ पासून हे असंच चाललंय तिचं …… घरातल्या कुठल्याही कामात मनंच लागत नव्हतं.
नाही ! मानेला हलकासा झटका देत तंद्रीतून बाहेर पडत ती पुटपुटली
पुन्हा चिटोरा डायरीच्या आत ढकलला आणि उठली जागेवरून. चिटोरा ठेवला तरी त्यावरचा नंबर मनात उचंबळ्या खात होता. मनात विचारांचा घोळ चालूच होता. ती किचनच्या ओट्याजवळ आली, हंड्यातून पाणी काढून प्याल्यात ओतले आणि प्याला ओठांना लावत घटाघटा प्यायली, ग्लास ओट्यावर ठेवत वळली अन ओट्याला टेकून तशीच उभी राहिली…. विचारांची तंद्री पुन्हा … किती वेळ तिलाही कळालंच नाही.
सात वर्ष निघून गेलीत, कॉलेज चा तो दिवस अजूनही तसाच डोळ्यासमोर उभा राहायचा तिच्या,
ती नौकरी करायची, गरजच तशी होती. वडील नसलेल्या तिला घर चालवण्यासाठी, लहान भावाच्या शिक्षणासाठी आईची मदत करणं गरजेचं होतं. पण शिक्षण सोडायचं नव्हतं. खूप शिकावं हा ध्यासच होता तिचा.
त्या दिवशी अशीच डोळ्यात पाणी घेऊन मुसमुसत कॉलेज च्या ऑफिस मधून बाहेर पडली आणि अक्षय शी नजरानजर झाली. …पहिल्यांदाच …
क्लासमेट म्हणून एकमेकांना ओळखत होते पण यापूर्वी कधीही ते एकमेकांशी बोलले नव्हते. आणि आत्ता तो पुढ्यात उभा राहून तिला न्याहाळत होता. तिच्या पडलेल्या चेहेऱ्यावर काहीतरी शोधू पाहत होता. ती नजर चोरून वळून जाऊ पाहत होती पण तो आणखीच तिच्या पुढे आला त्याच्या नजरेने तिचे अश्रू हेरले होते …
तो "थांब, काय झालं ??"
तिनं 'काही नाही' असा मानेनेच नकार दिला
तो " hello, tell me what happen ? कोणी काही बोललं का तुला ?"
त्याच्या या शब्दांनी तिचे डोळे अधिकच वाहू लागले….
" एग्झाम चा फॉर्म भरायला नाही म्हणताहेत सर, माझी प्रेझेंटी कमी पडतेय"
तो " असं कसं म्हणताहेत ? तू चल माझ्यासोबत " असं बोलून त्यानं हात धरला तिचा आणि घेऊन गेला परत ऑफिस मध्ये
अक्षय च्या बोलण्यात जादू होती कि सांगण्याची पद्धत तशी वेगळी कळालं नाही पण एग्झाम दिली तिने
त्यानंतरही त्यानं अनेकदा तिच्याशी असलेली मैत्री प्रत्येकवेळी निभावली तिच्या प्रत्येक अडचणीत तिला साथ दिली.
ती मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कधीच त्याला बोलू शकली नाही मनात असूनही "माझा धरलेला हात सोडू नकोस रे, मला हवायेस तू "
आज सात वर्षांनी ती शोधतेय त्याला परत, त्याच्या आठवणीने व्याकूळ होतेय …. तो दिवस डोळ्यासमोर तरळतोय सारखा. आजही डोळ्यात अश्रू आहे तिच्या तीन वर्षाच्या बाळाला घेऊन व्यसनी नवऱ्याचा अत्याचार सहन करतेय ती …
पण तिचा हात धरून आणून नवऱ्या समोर उभे करून त्याला ठसक्यात जाब विचारणारा कोणीच नाहीये हि जाणीव प्रखर झाली होती गेल्या काही दिवसात ….
गुगल वरून त्याचा नंबर शोधून काढला होता तिनं काल रात्री …. आणि आज सकाळ पासून तिचा तिच्या मनावर ताबाच उरलेला नाही.
तंद्री तुटली तिनं पुन्हा इकडे तिकडे पाहीलं चेहेऱ्यावरून हात फिरवला …. घड्याळ १ वाजल्याचं दाखवत होतं . दीड वाजता मिलिंद जेवायला येईल त्या आधी एकदा बोलून घेऊया का अक्षय शी ?… तिचं मन पुन्हा आगतिक झालं
तिनं मोबाइल उचलला नंबर फिरवला ….
समोरून आवाज आला त्याचा "हेलो…येस्स ?"
ती सकपकली जरा, काहीवेळ स्तब्ध …निरव शांतता इकडेही अन तिकडेही …
ती 'अं सॉरी… च च चूकून लागला हो फोन ……' रीसिवर ठेवून दिला तिनं
तिच्या हृदयाचे ठोके प्रचंड गतीने वाजत होते 'हेलो…येस्स.' त्याचा आवाज कानात सारखा वाजत होता.
आपला आवाज ओळखला असेल का त्यानं ? छे छे !!
दोनंच मिनिट
दोनंच मिनिटात तिचा फोन पुन्हा वाजू लागला …वाजत राहिला अखंड
भरल्या डोळ्यानं तिनं पाचवा फोन उचलला … तोच ओळखीचा आवाज
" थांब! फोन ठेवू नकोस, काय झालं …. tell me what happen ? कोणी काही बोललं का तुला ?"
त्याच्या या शब्दांनी तिचे डोळे अधिकच वाहू लागले….
ती नुसतीच मुसमुसत राहिली मग काहीही न बोलता … !!